शुक्रवार, १९ मे, २०१७

महायानाची मूलभूत ओळख : २


 सदर लेख हा बुध्द पाैर्णिमेच्या दिवशी लिहिलेला असुन आज प्रकाशित करण्यात येत आहे..



महायानाबाबत सुरूवातीला माझा दृष्टिकोन कधीही अनुकूल नव्हता, माझ्या ठायी असलेल्या अज्ञानामुळे मी सतत टीका करीत असे. (धर्म त्याबद्दल क्षमा करो) पण जेव्हा अनुभुतीने जाणले की महायान नेमके काय आहे, तेव्हा मनातून ध्वनी निर्माण झाला (कोणी काहीही म्हणो पण)  महायानासारखा श्रेष्ठ धर्ममार्ग जगात दुसरा नाही  (ही माझी अनुभूती आहे इतरांची वेगळी असू शकते याचा अर्थ असा नव्हे की इतर धर्म - संप्रदायांना मी कमी लेखतो, पण इतके मात्र म्हणेन की कोणाचीही महायानाशी तुलना होऊ शकत नाही even जो श्रावकयानी पारंपारिक प्रचलित बाैध्द धर्म आहे, तो महायान बाैध्द धर्माच्या तुलनेत मागे आहे असे माझी अनुभुती सांगते.) अनेकांना महायान म्हणजे नेमके काय हे माहित नसेल तर काहींनी ते नाव यापुर्वी ऎकले असेल. त्या सर्वांसाठी सांगतो,  भगवान बुध्दांची शिकवण हि तीन  भागात विभागली आहे : 

१. श्रावकयान, 
२. प्रत्येक बुध्दयान तसेच 
३. बोधीसत्त्वयान.. 

यातील बोधीसत्त्वयान हे महायान आहे आणि महायान हे बोधीसत्त्वयान.. ज्याचा उपदेश भगवान बुध्दांनी सामान्य मानवांच्या साठी नाही, तर बोधीसत्वांच्या साठी केला आहे. (अर्थात कोणीही बोधीसत्त्वत्व प्राप्त करु शकते) असा हा धर्ममार्ग अनेक पैलुंनी श्रेष्ठ ठरतो, त्यांच्यातील मुख्य म्हणजे त्यामध्ये प्रवेश मिळविण्याचा मार्ग. 


इतर धर्म संप्रदायामध्ये तुम्हाला सामील करुन घेण्यासाठी विशेष प्रकारची प्रलोभने दाखवितात, नरकाची भीती दाखवितात आणि त्यानुसार एखादे निरुपयोगी कर्म कांड करुन धर्म परिवर्तन केले जाते. अनेकदा मनुष्याला ते त्याच्या जन्मासहच प्राप्त होते. अर्थात तथाकथित धर्म - संप्रदाय मानणाऱ्या माता पित्याच्या पोटी जन्म झाला की, तो विशिष्ट धर्म - संप्रदायाचा म्हणून ओळखला जातो, मग त्याच्याद्वारे धर्माचे आचरण केले जाते किंवा नाही याला विशेष महत्व नाही.. पण महायानाच्या बाबतीत मात्र तसे नाही, इथे प्रवेश मिळवून घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा (Entrance Exam) द्यावी लागते. त्या मार्गावर चालण्यासाठी स्वतःला सिध्द करुन दाखवावे लागते की ह्या मार्गावर चालण्यासाठी मी सक्षम आहे, तेव्हाच महायानात प्रवेश मिळतो. त्या प्रवेश परीक्षेचे नाव आहे बोधीचित्तोत्पाद अर्थात बोधीचित्ताची प्राप्ती. बोधीचित्ताची  निर्मिती. बोधीचित्त हे महायानाचे प्रवेशद्वार आहे, तुमच्याकडे बोधीचित्त असेल तर तुम्ही महायानात आहात, आणि तुमचे बोधीचित्त नष्ट झाले तर तुम्ही महायानातुन भ्रष्ट झालेत. असा त्याचा अर्थ आहे..


आपल्या सामान्य मानवांच्या चित्तामध्ये आणि बोधिचित्तामध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे. आसक्तीच्या महासागरात बुडालेले आपले मन बोधीचित्तासारखा उदात्त विचार करु शकत नाही. सामान्य चित्त आणि बोधीचित्त यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी महायानात केल्या जाणाऱ्या बोधीसत्त्वांच्या प्रार्थनांचे मी केलेले मराठी भाषांतर येथे देत आहे.


पण ह्या प्रार्थनांना वाचण्यापुर्वी काही गोष्टी जाणून घ्या :
 
१. महायान हा केवळ प्रार्थनांवर आधारित धर्म नसून एक प्रयत्नवादी धर्ममार्ग आहे- भक्तीमार्ग नाही. ह्यामध्ये कोणत्याही ईश्वराची किंवा भगवान बुध्दांची भक्ती केली जात नसुन ज्या काही प्रार्थना केल्या जातात त्या धर्ममार्गावर चालतांना किंवा चालण्यासाठी  आपल्या चित्ताचा विकास व्हावा यासाठी..

२. ह्या प्रार्थना काही पोकळ शब्द नसून तो बोधीचित्त प्राप्त जीवांच्या हृदयातुन निघालेला ध्वनी अाहे. त्या प्रार्थना त्या सर्वांच्या चित्ताची मानसिक अवस्था प्रदर्शित करतात.

३. सामान्य मानवी चित्त प्राप्त जीवांना कदाचिर वाटेलही, असे होऊ शकणार नाही. ह्या प्रार्थना केवळ म्हणण्यापुरता मर्यादित आहेत. पण तुम्ही चुकत आहात. कारण ह्या मार्गावर चालण्यास सिध्द अशा प्रत्येक जीवांना ह्या प्रार्थना उर्जा प्रदान करतात, हे मी स्वतःच्या अनुभूतीच्या आधारे सांगत आहे..

४. ह्या प्रार्थना केवळ महायानात प्रवेश केलेल्या बोधीचित्त प्राप्त जीवांसाठी आहेत, सामान्य व्यक्तीचे चित्त त्यांचा भार पेलण्यासाठी सक्षम नाही.
 


महायानाच्या काही प्रार्थनांचे मराठीत केलेले भाषांतर पुढीलप्रमाणे :

🌷 चतुर्ब्रह्मविहार 🌷


१. सर्व जीवांना सुख लाभो, सुखाची कारणे लाभोत...

२. सर्व जीव दुःखापासून आणि दुःखाच्या कारणापासुन मुक्त होवोत.

३. सर्व जीव सुखापासुन दुर न होवोत, ज्याला दुःखमुक्तीचा म्हणतात..

४. सर्व जीव समतोल वृत्तीमध्ये विहार करीत, तृष्णा व तिटकारा यांच्यापासून मुक्त होवोत.

🌷 चार प्रतिज्ञा 🌷


१. जीवसृष्टी अनंत आहे, तिला भवसागर नेण्याची प्रतिज्ञा करुया..

२. आपणांत असंख्य दोष आहेत, त्यांना नष्ट करण्याची प्रतिज्ञा करुया..

३. धर्माचे द्वार अनंत आहेत, त्या सर्वांचे आकलन करण्याची प्रतिज्ञा करुया...

४. जागृती (बोधी) अतुल्य आहे, ती साध्य करण्याची प्रतिज्ञा करुया..

🌷 बोधीसत्वाच्या आचारसहिंता 🌷


ज्याप्रमाणे श्रावकयानामध्ये गृहस्थांना पंचशीलांची आचारसहिंता भगवान बुध्दांनी सांगीतली आहे, अगदी त्याचप्रमाणे महायानात बोधीसत्त्वांसाठी ३७ आचारसहिंता सांगितलेल्या आहेत. आपल्या बोधीचित्ताचे रक्षण करण्यासाठी व महायानावर आरुढ राहण्यासाठी ह्या आचारसहिंतांचे पालन अत्यंर आवश्यक आहे. लेखाची वाढती लांबी पाहता मी त्यांच्यापैकी काहीच इथे देतो.

💐 प्रिय व्यक्तींच्या बद्दल असलेली आसक्ती पुराच्या प्रवाहाप्रमाणे चिरडून टाकते तर शत्रूंच्या बद्दल असलेला द्वेष अग्नीप्रमाणे जाळून टाकतो. या गोंधळामध्ये काय स्वीकारायला पाहिजे हे आपण विसरतो, गृहभुमी सोडणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 कोणत्या देवांना शरण जात आहात...? जे स्वतःच बंधनात (संसारचक्रात)  अडकले असतांना ऎहिक देव तुमचे रक्षण करण्यास समर्थ आहेत का ..? त्यांच्याद्वारे रक्षित केल्या गेलेल्यांचे रक्षण करण्यास जे कधीच चुकत नाहीत अशा त्रिरत्नांना शरण जाणे - हि बोधीसत्त्वांची साधना आहे.

💐 अनादि काळापासुन तुमच्या माता तुमच्यावर प्रेम करीत आल्या आहेत, तेव्हा तुम्ही स्वतः आनंदित असण्याला अर्थ काय..? अनंत लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी बोधीचित्ताची प्राप्ती करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 सर्व दुःख तुमच्या आत्मसुखाच्या कामनेतुनच उत्पन्न झाले आहेत. सर्व जीवांना मदत करण्याच्या विचारातूनच सम्यक संबुध्दांची निर्मिती झाली आहे. दुसऱ्यांच्या दुःखासोबत स्वतःच्या सुखाची अदलाबदली करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 एखाद्याने जरी तीव्र इच्छाशक्तीने तुमची सर्व संपत्ती लुटली, त्याला तुमचे शरीर संपत्ती किंवा जे काही पुण्य कर्म केलेले आहेत किंवा करणार अाहात, ते सर्व समर्पित करा - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 तुम्ही काहीच चुकीचे केले नसतांना सुध्दा जर कोणी तुमचे डोके उठविण्याच्या प्रयत्नात असेल तेव्हा करुणायुक्त चित्ताने त्याची सर्व पापकर्म स्वतःच्या अंगावर घ्या - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल अत्यंत वाईट आणि चुकीच्या किंवा खोट्या गोष्टींचा प्रचार अगदी तीन हजार लोकांमध्ये  करीत असेल., तरीसुध्दा प्रितीयुक्त चित्ताने त्याच्या कार्यक्षमतेची स्तुती करा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जर तुमचा कोणी उपहास करीत सार्वजनीक ठिकाणी तुम्हाला वाईट किंवा टोचून बोलत असेल, त्याला तुमचा कल्याणमित्र समजुन नम्रतेने अभिवादन करा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 तुमच्या समान किंवा कनिष्ठ असलेला (त्यांच्या आंधळ्या) गर्वामुळे तुच्छतापुर्वक बोलत असेल, तुमच्या कल्याण मित्राप्रमाणे त्याच्यापुढे नतमस्तक व्हा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जरी तुम्हाला कोणाचाही आधार नसेल, सर्वजण तुमचा तिरस्कार करीत असतील. भयंकर आजाराने ग्रस्त आणि वाईट शक्तींनी तुमच्यावर अतिक्रमण केला असेल तरी सुध्दा कोणत्याही प्रकारच्या निराशेने व्यथित न होता सर्व जीवांची दुःखे आणि पापकर्मे अंगावर घेणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 तुमची किर्ती दुरवर पसरलेली असेल आणि अनेक लोक तुमचा गाैरव. करत असतील, धनाची देवता कुबेरा इतके जरी तुम्ही धन प्राप्त केले असेल . तरी ऎहिक लाभांना कसलेही सार नाही हे जाणा - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जेव्हा तुमचा खरा शत्रू असलेल्या रागावरच तुम्ही विजय मिळवू शकले नाहीत, तर बाह्य शक्तींवर विजय मिळविल्यावर सुध्दा त्याची वृध्दीच होईल. प्रेम आणि करूणेच्या सत्तेखाली मनाला आणणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 दुःखाचे सर्व प्रकार हे तुमच्या मुलाच्या मृत्यूचे स्वप्न पाहण्यासारखे आहे. , ह्या गोंधळाला सत्य समजल्यावर तुमचे अश्रु गळतीला.  जेव्हा तुम्हाला वाईट प्रसंगाला सामोरे  जावे लागेल तेव्हा त्यांचा स्वप्नातील गोंधळ समजून त्याग करा. - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 सम्यक संबोधी प्राप्तीची कामना करणाऱ्यांना त्यांच्या शरीराला सुध्दा दान करावे लागते. तेव्हा तुमच्या सामान्य गोष्टींच्या  विषयी बोलण्याची आवश्यकताच काय..?  कोणत्याही प्रकारच्या परतफेडीची कामना न करता दान देणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐  नैतिक आचारसंहिते शिवाय तुम्ही स्वतःचे सुध्दा कल्याण करु शकत नाही, तर इतरांच्या कल्याणाची कामना करणे हा विनोदच आहे. ऎहिक आकांक्षांचा त्याग करुन आपल्या नैतिक आचारसंहितेचे रक्षण करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 शीलांच्या वृध्दीची कामना करणाऱ्या बोधीसत्वांसाठी, तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न करणारा जीव हा एक अमूल्य खजीनाच आहे, सर्वांच्या बाबतीत सहनशिलतेची वृध्दी करणे, चिडचिड आणि संतापापासुन सदैव मुक्त राहण्याचा प्रयत्न करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐  स्तुती आणि आदराची कामना हे भांडसे निर्माण करण्यासाठी कारणीभुत असतात; अभ्यास , स्मृती आणि ध्यान त्याने नष्ट होते. यामुळे मित्र, नातेवाईक आणि मदत करणाऱ्यांच्या प्रति असलेल्या आसक्तीला नष्ट करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 वाईट शब्द इतरांच्या चित्तांची शांती भंग करातात ; जे बोधीसत्वांच्या आचरणाला निकृष्ट करण्यासाठी कारणीभूत होतात. त्यामुळे इतरांना वाईट वाटणाऱ्या असह्य शब्दांचा वापर न करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

💐 जेव्हा तुम्ही भावनिक प्रतिक्रिया देता किंवा इतर बोधीसत्वांच्या दोषांच्या बाबतीत तक्रार करता , तेव्हा तुम्ही स्वतःलाच ढासळवत आहात. महायानामध्ये प्रवेश केलेल्यांच्या दोषांच्या बाबतीत तक्रार न करणे  - ही बोधीसत्वांची साधना आहे.

💐 अनंत जीवांच्या दुःखांना नष्ट करणे, तिन्ही लोकांच्या शुध्दतेला जाणे, सम्यक संबोधीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतांना प्राप्त झालेल्या पुण्यांना समर्पित करणे - ही बोधीसत्वांची साधना आहे..

- 37 Practices of Bodhisattva (मराठी अनुवाद : पियुष खोब्रागडे)



🌷 बोधीचित्त 🌷


१. ज्याप्रमाणे बुध्द आणि महाबोधीसत्वांनी महासंबोधीच्या चित्ताला निर्माण केले, अगदी त्याचप्रमाणे मी सुध्दा आतापासुन जेव्हापर्यंत सम्यक संबोधीच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही, तेव्हापर्यंत बोधीचित्ताची निर्मिती करेन. रक्षित नसलेल्यांचे रक्षण करण्यासाठी, बंधिस्तांना मुक्त करण्यासाठी,  थकलेल्यांना आराम देण्यासाठी आणि दुःखाच्या पार न गेलेल्यांना दुःखाच्या पार नेण्यासाठी ...

२. जेव्हा जगामध्ये अस्वस्थता वाढायला लागेल तेव्हा अनंत जीवांच्या शोकांना नष्ट करण्यासाठी, वाईट मार्गावर जाण्यापासून अडविण्यासाठी, दुःखातून मुक्त करण्यासाठी आणि दुःखाच्या अनेक कारणांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी निःस्वार्थी अशा बोधीचित्ताची निर्मिती करेन..

३. सर्व निराधार जीवांसाठी मी शरण व्हावे, ज्यांचा कोणीही रक्षण करणारा नाही, असामचा रक्षणकर्ता व्हाचे. ज्यांचा कोणी आधार नाही त्यांचा आधार व्हावे. आरक्षित, दुःखी, कष्टी जीवांसाठी शरण व्हावे, शांतीचे कारण व्हावे..

४. ह्या अथवा पूर्वीच्या जीवनात माझ्याद्वारे जे काही कुशल कर्म केले गेले आहेत, इत्यादी (अशा सर्व पैलुंचा संग्रह जो मला प्राप्त झाला आहे) ज्याला पुण्य आणि प्रज्ञा म्हटले जाते. तसेच सहा पारमितांची भावना करित असतांना माझ्याद्वारे जे काही प्रयत्न कुशल कर्म) केले गेले असेल, त्यांचा लाभ जगातील सर्व जीवांना होवो. त्यांच्याद्वारे अनंत लोकांच्या शोकाचे नाश होऊन तते मुक्त होवोत. 

५. दुर्गतीच्या दुःखापासून मुक्ती आणि सर्व जीवांच्या द्वारे करण्यात आलेल्या पुण्याचे मी अानंदाने  अनुमोदन करतो. सर्व दुःखी जीव सुखी होवोत, जेवढे शरीरधारी जीव आहेत, त्यांच्या सांसारिक दुःखापासून मुक्तीचे अनुमोदन करतो..

६. सर्व जीवांना सुख देणारे व सर्व जीवांच्या कल्याण करणाऱ्या बोधीसत्वांच्या चित्तोत्पाद सागराचे अनुमोदन करतो. सर्व दिशांना विद्यमान असलेल्या बुध्दांना हात जोडून प्रार्थना करतो की त्यांनी  दुःखाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या प्रती मोहभावनेने धर्मदीप प्रज्वलित करावा.

७. निर्वाण मार्गावर आरुढ असलेल्या बुध्दांना हात जोडून वंदना करतो की, त्यांनी अनंत काळापर्यंत मरणाला स्वीकारु नये. त्यामुळे जगात अंधकार पसरणार नाही. अशाप्रकारे हे सर्व कर्म करून मी जे काही पुण्य प्राप्त केले आहे, त्याद्वारे सर्व प्राण्या दुःखाला नष्ट करणारा मी होऊ शकेन. 

८.  दुःखीतांचे जीवन पूर्णपणे नष्ट होईपर्यंत मी रोगी लोकांच्या करिता आैषध व्हावे, वैद्य व्हावे, परिचारक सुध्दा व्हावे. भुकेने व्याकुळलेले व तहाणलेले असतील त्यांचे दुःख ; भोजन व पाण्याचा वर्षाव करुन दुर करावे आणि ह्या दुष्काळा नंतर अनेक कल्पांपर्यंत त्यांचे भोजन व्हावे. 

९. दरिद्री लोकांच्या करिता मी कधीही न ससंपणारे साधन व्हावे आणि विविध प्रकारच्या साधनांनी त्यांच्यासमोर हजर रहावे. मी माझ्या शरीराचे भोग व तिन्ही काळातील सर्व पुण्याचे अासक्तिविरहीत भावनेने सर्व जीवांच्या अर्थसिध्दी करीता त्यांच्या कल्याणासाठी दान करायला तयार आहे. 

१०. संपुर्ण त्याग म्हणजेच निर्वाण आहे आणि माझे मन निर्वाण प्राप्त करण्यास इच्छुक आहे. जर मला संपुर्ण त्याग करायचाच आहे तर या शरीरालाच ; जीवांना दान देणे हेच उत्तम आहे. सर्व जीवांना सुखाची प्राप्ती होईल, त्याप्रमाणे मी माझ्या शरीराला दान केले आहे., तेव्हा त्यांना जेव्हा वाटेल ते याला मारून शकतात, याची निंदा करु शकतात किंवा यावर धुळ फेकु शकतात. 

११. ते माझ्या शरीराशी खेळलेही किंवा विलास सुध्दा केला तरी मला त्याची काय पर्वा..? कारण मी त्यांना आपले शरीर दान दिले आहे. त्यांना माझ्या शरीराच्या ज्या - ज्या कार्यापासुन सुख प्राप्त होत असेल, ते ते कार्य ह्या शरीरापासुन घेऊ शकतात, कारण माझ्यामुळे कोणाचेही अहित होऊ नये.

१२. जे कोणी माझे निंदक असतील आणि जे कोणी अपकारक असतील आणि अाणखीही जे कोणी उपहास करणारे असतील ते सर्व बोधीला प्राप्त व्हावेत. जे अनाथ आहेत, त्यांचा मी नाथ व्हावे, तसेच पार जाणाऱ्यांची नाव सेतु व वाहक व्हावे. जीवांसाठी मी चिंतामणी रुपी उत्तम घर व्हावे, सिध्द व्हावे महान आैषधी व्हावे, तसेच कल्पतरु आणि कामधेनु व्हावे. 

१३. ज्याप्रमाणे पृथ्वी इत्यादी चार महाभुत हे अनंत आकाशापर्यंत व्याप्त अप्रमेय जीवांकरीता मी तोपर्यंत विविध प्रकारे आधार व्हावे, जोपर्यंत सर्व जीव मुक्त होत नाहीत. जसे आधी बनुन गेलेल्या सुगतांनी बोधीचित्ताला प्राप्त केले तसेच त्यांनी बोधीसत्वांच्या आचारसहिंतेचे पालन केले, त्याचप्रमाणे जगाच्या कल्याणासाठी मी बोधीचित्ताला उत्पन्न करुन त्या शिकवणीला त्याच क्रमाने स्वीकार करेन.  

- बोधीसत्त्वचर्यावतार (आर्य शांतीदेव)

Do even fathers and mothers Have such a benevolent intention as this? Do the gods and sages? Does even Brahma have it?

इतक्या महान प्रार्थना कोणत्या धर्ममार्गात केल्या जातात का..? जिथे प्रत्येक जीव केवळ स्वतःच्याच हितासाठी प्रार्थना करतात आणि त्याद्वारे इतरांना हानी होत आहे किंवा नाही ह्या साध्या गोष्टींकडे सुध्दा त्यांचे लक्ष जात नाही. पण बोधीसत्त्व मात्र सर्व विश्वाच्या कल्याणासाठी स्वतः समर्थ बनण्यासाठी साधना करतात त्यासाठी ते त्यांच्या जीवनाचे दान देण्यासाठी सुध्दा मागे पुढे पाहत नाही.
वरील सर्व गोष्टी सांगण्यासाठी आज काही महायानाचा दिवस नाही परंतु बोधीसत्त्व सिध्दार्थाच्या सम्यक संबोधी प्राप्तीचा दिन मात्र आहे. ज्या दिवशी अनंत लोकांच्या कल्याणाच्या अकृत्रिम अभिलाषेसह अनेक पारमिता पूर्ण करुन बोधीसत्त्व सिध्दार्थाने सम्यक संबोधीची प्राप्ती केली. त्या ध्येयापर्यंत पोहोचतांना बोधीसत्त्व ह्याच मार्गावरून गेले, त्याबद्दल सामान्य माहिती होण्यासाठी ह्या लेखाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे
 सर्व जीव सुखी होवोत, सर्वांना हिताचा मार्ग सापडो* 🙏🏻🙏🏻

-  © पियुष खोब्रागडे

      १०.०५.२०१७




www.buddhistsofindia.blogspot.in 

® सदर लेख कोणत्याही माध्यमांच्या द्वारे शेयर करतांना ह्या Blog चा URL सोबत जोडणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा सर्व हक्क सुरक्षित...



+++

बुधवार, १७ मे, २०१७

मैत्रेय आणि महायानाबाबत असलेले काही गैरसमज..

महायान आणि बोधीसत्त्व संकल्पनेच्या बाबतीत आज बरेच गैरसमज समाजामध्ये पसरले आहेत. काही लोक त्या गैरसमजुतींना सत्य मानून आपल्याच मनाच्या कथा रचतांना बोधीसत्वाच्या ह्या महान संकल्पनेचा संबध कोणी अवतारवादाशी तर कोणी त्यांच्या प्रेषितांशी जोडून पाहत आपल्याच मनाचे मनोरे रचण्याचा प्रयत्न करित आहेत. त्या सर्वांच्या गोड गैरसमजुतींचे खंडन करण्यासाठी सदर लेख लिहित आहे.


सर्वप्रथम काही लोक असा प्रचार करतांना दिसतात की, मैत्रेयाची संकल्पना ही महायान पंथाने जन्माला घातली असुन ती एक थोतांड पसरविणारी संकल्पना आहे. त्या सर्वांनी हे लक्षात घ्यावे की बोधीसत्त्व संकल्पना ही जरी महायानाची केंद्रीय संकल्पना असली तरी मैत्रेयाचे मुळ पारंपारिक पाली तिपिटकातच आहे. परंतु आपली समजूत महायानाला एक अंधश्रद्धेवर आधारलेला धर्म अशी झाल्यामुळे आपण त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतो आणि प्रत्येक वेळी आपल्या श्रध्दांना न पटणाऱ्या किंवा अंधश्रध्देवर अाधारलेल्या गोष्टींचा संबंध आपण त्याच्याशी लावतांना दिसतो. जसे - काहींच्या मते पुनर्जन्माची संकल्पना ही महायानाची व्युत्पत्ती आहे, पण तसे नाही ती भगवान बुध्दांनी उपदेश केलेल्या श्रावकयानावरच आधारलेली आहे. ह्या सर्व गैरसमजुतींमुळे मी महायानाच्या बाबत थोडक्यात सांगू इच्छितो.


महायान जसा दिसतो तसा नाहीच, तुम्ही बाहेरून महायानाचा न्यायनिवाडा करु शकत नाहीत, त्यासाठी तुम्हाला त्याला बरोबर जाणून घेता आले पाहिजे, त्याचे योग्य प्रकारे आकलन करता आले पाहिजेत. तो एका नारळाच्या फळासारखा आहे, बाहेरून कठोर आणि खाण्यायोग्य न दिसणारा आतुन तितकाच सुयोग्य आहे. मी महायानाच्या बाबत जो काही अनुभव घेतलेला आहे, त्यानुसार सांगू शकतो की तो कर्मकांडावर आधारित धर्ममार्ग नाही, तर तो ज्या काही साधना सांगतो त्या सर्व फळ देणाऱ्याच आहेत. केवळ बाप्तिस्मा, सुंता, दीक्षा, इत्यादी प्रकारच्या विधींना संपन्न केल्याने तुम्ही महायानात प्रवेश मिळवू शकत नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला तुमची योग्यता सिध्द करावी लागते, त्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रवेश परिक्षा द्यावी लागते, तेव्हाच तुम्हाला त्यामध्ये प्रवेश मिळतो. जगातला कोणताही धर्म ह्या प्रकारच्या कसोट्यांना पुर्ण करण्याचे आव्हान देत नाही. ते केवळ त्यांच्या धर्मसंस्थापकांची किंवा त्यांनी सांगितलेल्या ईश्वरांची भक्ती करायला सांगतात., त्यातूनच तुमचे पाप धुतले जातील सुगती प्राप्त होईल अन्यथा दूर्गति होईल असा सिध्दान्त सांगतात. याउलट महायानात सर्व कर्मावर आधारित आहे., कोणाच्या भक्तीवर नाही. हा मूलभूत फरक जरी समजला तरी सुध्दा आपण महायानाच्या महत्तेबद्दल समजून घेऊ शकतो. याविषयावर सांगण्यासारखे तर बरेच काही आहे, पण लेखाची लांबी लक्षात घेता मुख्य मुद्यावर येतो..


बोधीसत्त्व संकल्पनेच्या बाबतीतही बरेच गैरसमज पसरले आहेत, काहींच्या मते बोधीसत्त्व हा बुध्दांचा अवतारवाद प्रदर्शित करतो. त्यांच्या मते भगवान बुध्दांनी बोधीसत्वांच्या रुपांमध्ये अनेक अवतार घेतले आहेत. तर बाैध्द परंपरेमध्ये अनेक बुध्दांची जी काही संकल्पना मांडली जाते, त्यातील सर्व बुध्द हे एकाच बुध्दांचे अनेक रुप असुन धर्माचा विनाश झाल्यावर बुध्द स्वतः अवतार घेतो असा गोड गैरसमज अनेकांचा आहे. त्या सर्वांनी लक्षात घ्यावे की, बोधीसत्त्व हा काही स्वर्गातून पडलेला जीव नाही. तर "बुध्दो भवेयं जगतो हिताय" अर्थात सर्व जीवांच्या हितासाठी आणि सुखासाठी मी बुध्दत्वाची प्राप्ती करेन अशा प्रकारची अकृत्रिम अभिलाषा आपल्या चित्तामध्ये निर्माण करुन त्यासाठी आपल्या सर्वस्वाच्या त्यागाची सुध्दा तयारी ठेवणारा आपल्यासारख्या सामान्य मनुष्याच्या चित्ताचेच विकसित रुप आहे. त्याच्या त्या साधनांमुळे त्याचे चित्त (बोधीचित्त) त्या स्तरावर पोहोचले आहे, जिथे इतरांच्या कल्याणासाठी स्वतःच्या जीवाचे दान देतांना सुध्दा त्याला आनंद होतो. महायानात ज्या काही प्रार्थना (साधना) केल्या जातात त्या अशा मार्गावर चालण्यासाठी मन प्रगल्भ व्हावे यासाठीच .. अर्थात बोधीसत्त्व हा सामान्य मनुष्यच आहे, पण त्याचे चित्त सामान्य नसून बोधीचित्त आहे. असा हा बोधीसत्त्व अनेक पारमिता पूर्ण करुन शेवटी जगाच्या कल्याणासाठी  बुध्दत्वाची प्राप्ती करतो (ज्या कालावधी मध्ये धर्माचा नाश झालेला असतो, जेव्हा लोकांनी बुध्द हे नाव सुध्दा ऎकलेले नसते) अशी बोधीसत्त्व संकल्पना अाहे.


अनेक बुध्दांच्या संकल्पनेच्या विषयी सांगायचे झाले तर, प्रत्येक जीव हा बुध्द बनण्याची क्षमता राखतो. ह्या जगातील प्रत्येक जीव हा बुध्द बनू शकतो, त्यामुळे अनेक बुध्दांच्या संकल्पने विषयी शंका बाळगण्याचे काही कारण नाही. कारण गाैतम बुध्द हे प्रथम बुध्द नव्हतेच, त्यांच्यापुर्वी सुध्दा अनेक बुध्द होऊन गेले आणि नंतरही अनेक होतील. याचा अर्थ असा नव्हे की, एकच बुध्द अनेक वेळा अवतार घेतो. गाैतम बुध्दांच्या पूर्वी जे काही बुध्द होऊन गेलेत आणि नंतर जे कोणी होतील त्यांचा गाैतम बुध्दांशी संबंध नाही, ते वेगवेगळे व्यक्ती आहेत; ज्यांनी स्वयंप्रयत्नाने बुध्दत्वाला प्राप्त केले आहे.

त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की, " बुद्धाला जेव्हा विचारले गेले तुमच्या पश्चात आम्हास मार्गदर्शन कोण करेल तेव्हा बुद्ध म्हणाले मी मैत्रेय म्हणुन. जन्मास येइल वा मैत्रेय हा त्याकाळी बुद्ध असेल."  हा चुकीचा सिध्दांत आहे, भगवान बुध्दांनी असे कधीही सांगितलेले नाही. भगवान बुध्दांना जेव्हा विचारले गेले की, तुमच्या पश्चात आम्हाला मार्गदर्शन कोण करेल..? तर भगवानांनी उत्तर दिले धम्म..!! मी उपदेश केलेला धर्मच माझ्या पश्चात तुम्हाला मार्गदर्शन करेल. भगवान बुध्दांनी असे सांगितले नाही की, मी मैत्रेय म्हणून जन्मास येईल. असे होऊच शकत नाही, कारण ते धर्मविरोधी आहे. बुध्दांनी पुनर्जन्माचा क्षय केलेला आहे, त्यांनी मनाच्या सर्व बंधनांना तोडले आहे, त्यामुळे त्यांचा पुनर्जन्म होऊ शकत नाही. भगवान बुध्द ज्या मैत्रेयाच्या विषयी बोलत आहेत, ती बुध्दत्व प्राप्तीसाठी प्रयत्नरत दुसरी व्यक्ती आहे, स्वतः गाैतम बुध्द नाहीत. गाैतम बुध्दांच्या द्वारे उपदेश केलेला धर्म जेव्हा नष्ट होईल, अर्थात ह्या धर्माच्या बाबतीत कोणालाही काहीच माहिती नसेल तेव्हा मैत्रेय बोधीसत्त्व हा बुध्द बनणार. एका बुध्दांची शिकवण अस्तित्वात असल्यावर दुसरा कोणताही बुध्द जन्म घेऊ शकत नाही. ह्या सिद्धांताच्या मागे सुध्दा अनेक कारणे आहेत.

काही लोक ह्या बोधीसत्त्व संकल्पनेचा संबंध अवतार वादाशी लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाबतीत बाबासाहेब म्हणतात -

बोधीसत्वांच्या अनेक जन्मांचा किंवा जातकांचा हा सिध्दान्त ब्राह्मणांच्या अवतारवाद ह्या सिध्दांतासारखा वाटतो, अर्थात ईश्वराच्या अवतारासंबंधीचा सिध्दान्त. (पण तसे नाही, त्यात जमीन आस्मानाचं अंतर आहे) जातक सिध्दान्त हा भगवान बुध्दांच्या सर्वश्रेष्ठ शुध्द अवस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. यामध्ये बोधीसत्वाचे जीवन शुध्द असलेच पाहिजे, बोधीसत्त्व आपल्या जीवनामध्ये जन्मोजन्मी पवित्र बनत जातो व त्याचे अनुकरण कराणार्याचे रक्षण करतो. परंतु अवतारवादामध्ये ईश्वराच्या अवताराची जडणघडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणी संकल्पनेचा अर्थ इतकाच की, ईश्वर निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो. मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. परंतु बोधीसत्वाच्या बाबतीत मात्र तसे नाही, बुध्द बनण्यासाठी बोधीसत्वाला (किमान) सलग दहा जन्मांपर्यंत सर्वोच्च शुध्द जीवनाचे बंधन घालण्यात अाले आहे. बोधीसत्वाने अनेक जन्मांपर्यंत, बुध्दत्वाच्या प्राप्तीसाठी आवश्यक अशा शुध्द जीवन अवस्थेतुनच गेले पाहिजे. ह्या सिध्दांताला दुसऱ्या कोणत्याही शासनामध्ये तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या शास्त्याला अशा प्रकारच्या कसोटीला पूर्ण करण्याचे आव्हान देत नाही.

- दि बुध्द अॅण्ड हिज धम्म

ह्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असतील अशी अपेक्षा करतो. तसेच जे लोक इस्लामी प्रेषितांना बुध्दांनी सांगितलेला मैत्रेय मानतात, त्या लोकांनी सुध्दा बोधीसत्त्व संकल्पनेचा योग्य प्रकारे अभ्यास करावा ही विनंती करतो. तसेच मला त्यांच्या विषयी एक पडलेला प्रशन म्हणजे, ते त्यांच्या प्रेषितांना मैत्रेय ह्या बोधीसत्व रुपात मानतात की, बुध्द रुपात...? त्यानंतर सुध्दा आणखी अनेक प्रश्न पडतात -

अ. बोधीसत्त्व रुपात पाहत असतील तर :

१. बुध्दांची शिकवण अस्तित्वात असतांना ते बुध्दांना शरण का बरं गेले नाहीत...?

२. एका बोधीसत्वांच्या शुध्द व नैतिक जीवनाच्या कसोटीप्रमाणे त्यांचे जीवन होते का...?


ब. बुध्द रुपात पाहत असतील तर :

१. त्यांनी धर्मचक्राचे प्रवर्तन कशा प्रकारे केले..?

२. धर्म अस्तित्वात असतांना त्याला शरण जायला सोडून ईश्वराला (जे एक बाह्य शरण आहे) त्याला शरण जायला का बरं सांगितले..?

३. ते सर्व विकारांच्या पासून मुक्त होते का..? वास्तविक पाहता त्यांनिओ ज्या ईश्वराची संकल्पना मांडली आहे, तो भेदभाव करणारा, लोकांना गटसमुहांमध्ये विभागणारा, त्याची न ऎकणार्या जीवांना नरकात पाठविणारा जीव आहे, ज्याच्यावर माराचे साम्राज्य अस्तित्वात अाहे, असा ईश्वर सुध्दा जेव्हा माराच्या बंधनातून मुक्त नाही तर त्यांच्या प्रेषितांच्या बाबतीत आपण काय अपेक्षा करावी..?


कोणत्याही दोन गोष्टींची तुलना करतांना आपण नेहमीच ती नेमकॊ कशाशी करत आहोत, याचे भान ठेवावे...




हे सुध्दा वाचा :