यज्ञ आणि बुद्ध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यज्ञ आणि बुद्ध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

यज्ञाचा खरा अर्थ (भाग २ : अजीत केसकंबल विरुद्ध भगवान बुद्ध आणि यज्ञाचा खरा विधी..)



भगवान बुद्धांचे यज्ञांच्या संबंधी काय मत होते हे आपण मागच्या भागात बघितलेच आहे, त्यांनी हिंसक यज्ञाचा खुप विरोध केला होता, तर अहिंसक यज्ञांची प्रशंसा केली होती. (कारण त्यात कोणत्याही प्राण्यांची हिंसा होणार नव्हती..) सविस्तर लेख येथे वाचा.


या भागामध्ये आपण तत्काळातील यज्ञांच्या विरोध करणाऱ्यांच्या विरोध मार्गातील फरक पाहणार आहोत.


वैदिकांच्या यज्ञांचा विरोध करणाऱ्यांमध्ये भगवान बुद्ध आणि निर्गंथ नाथपुत्र महावीर स्वामी, इत्यादी श्रमण अग्रणी होते. परंतु यज्ञ विरोधकांच्या यादीतील एक महत्त्वपुर्ण नाव म्हणजे अजीत केसकंबल.


माझ्या मागील लेखामध्ये मी अजीत केसकंबलाच्या नास्तिकवादावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उच्छेदवादी अजीत केसकंबल हा बुद्धाचा समकालीन आणि नास्तिक होता. तत्कालील श्रमण आणि ब्राह्मण हे दोन मतांचे होते : १. शाश्वतवादी आणि २. उच्छेदवादी.


शाश्वतवादी मतांचे लोक समजत होते कि आत्मा हा नित्य आहे, तर उच्छेदवादी मतांचे म्हणायचे कि पंचमहाभुतांपासुन (काही चार महाभुत मानायचे) बनलेला हा आत्मा, शरीरनाशानंतर निसर्गात आपापल्या तत्वांना जाऊन मिळतो. तो उच्छेदवादी होता.


असा हा अजीत केसकंबल उच्छेदवादी असल्या कारणाने त्याचा पाप पुण्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्याच्या पंथात नैतिकता नावाची गोष्ट नव्हती. म्हणुन तो मनाला वाटेल तसा (नैतिकतेची सीमा ओलांडुन) इतरांवर टिका करीत असे. तत्कालीन ब्राह्मणांचा, ब्राह्मण व्यवस्थेचा आणि वेदांचा तो अत्यंत कडवा विरोध होता.



अग्नीहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठन्म! बुद्धीपौरुषहीनांना जिविका धातृनिर्माता!!

अर्थ : अग्नीहोत्र, तीन वेद, त्रीदण्ड धारण करणे आणि भस्म लावणे, हे निर्मात्याने निर्मिलेली बुद्धीहीन आणि पौरुषतत्व हीन (नपुसंक) पुरुषांची उपजिविका आहे.



यज्ञातील अग्नीहोत्रामध्ये मारलेला प्राणी जर स्वर्गात जात असेल, तर यज्ञाचे आयोजन करणारा आपल्या पित्याची आहुती त्यामध्ये का देत नाही... यज्ञयागांवर अशा प्रकारच्या टिका करणाऱयांमध्ये अजीत केसकंबल अग्रणी होता.


परंतु भगवान बुद्ध मात्र यज्ञ विरोधात आंधळे होऊन आपली नैतिकता विसरत नव्हते (तर दुसऱ्यांच्या श्रद्धांना ठेस न पोहोचवता) त्या यज्ञांमधुनच ते आपल्या धर्माचा प्रचार करीत होते, लोकांना सदाचार शिकवित होते. ते कसे काय...?

भगवान बुद्ध म्हणतात, यज्ञात प्राण्यांची आहुती दिल्याने यज्ञाचा आयोजक काया, वाचा आणि मनाने अकुशल कर्मांचे आयोजन करतो. त्यामुळे यज्ञ हे अमंगल कार्य आहे असे भगवान म्हणतात.

एकदा भगवान बुद्ध एका ब्राह्मणाला यज्ञाचा खरा विधी समजावुन सांगतात अशा प्रकारची एक कथा अंगुत्तर निकायाच्या सत्तक निपातातील महायान्नवग्गातील अग्गीसुत्तामध्ये सांगतात (अ.नि. ७:५:४)


एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनात्थपिंडिकाच्या जेतवनामध्ये राहत असताना उन्मत्त शरीराच्या ब्राह्मणाने एक महायज्ञ आयोजीत केला होता. त्या यज्ञांमध्ये पाचशे बैल, पाचशे गाई, पाचशे बकऱ्यां, पाचशे मेंढरी, इ. यज्ञामध्ये आहुती दिली जाणार होती. तेव्हा तो भगवान बुद्धांजवळ आला आणि त्यांना नमस्कार करुन बाजुला बसला.

ब्राह्मण म्हणाला,, हे श्रमण गौतम यज्ञासाठी अग्नीहोत्र उभारणे आणि अग्नी पेटविणे हे खुप फलदायक आहे असे मी ऐकले आहे.

भगवान म्हणाला, होय ब्राह्मणा मी सुद्धा तसेच ऐकले आहे.

दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा ब्राह्मण हे वाक्य बोलला आणि भगवंतांनीही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले...


ब्राह्मण म्हणाला, छान गौतमा! आपले विचार किती जुळतात.

त्यावर आनंद म्हणाला, हे ब्राह्मणा तुझे वाक्य बरोबर नाही. मी असे ऐकले आहे च्या ऐवजी तु असे म्हण कि यज्ञासाठी व अग्नीहोत्र पेटविण्याची मला इच्छा आहे आणि ती पुर्ण करण्याच्या मी प्रयत्नात आहे, तेव्हा भगवंतांनी मला उपदेश करावा कि त्याच्या प्रतापाने माझे चिरकाळापर्यंत कल्याण होईल.

आनंदाच्या म्हणण्या प्रमाणे ब्राह्मणाने भगवंतांना प्रश्न विचारल्यावर भगवान म्हणाला,, हे ब्राह्मणा,, यज्ञासाठी जो अग्नीहोत्र उभारतो आणि त्यात अग्नी पेटवितो तो त्या यज्ञापुर्वी तीन प्रकारची शस्त्रे उगारतो. जे दुर्गुण, दुःखाची उत्पत्ती आणि इतर अनेक प्रकारच्या दुःखाच्या उत्पन्नाला कारणीभूत असतात.

कायाशस्त्र, वाचाशस्त्र आणि मनशस्त्र...



• जो यज्ञाला सुरुवात करतो त्याच्या मनात इतके, बैल, बकरे, मेंढरे मारले जाणार इत्यादी दुःख उत्पन्न करणारे अकुशल विचार जन्म घेतात, याप्रमाणे तो सर्वप्रथम चित्त (मन) शस्त्र उगारतो. त्यानंतर त्या सर्व जीवांना आहुती देण्याला तो स्वतःच्या तोंडाने आज्ञा देतो. अशाप्रकारे तो दुःख उत्पन्न करणारे वाचाशस्त्र उगारतो.

• त्यानंतर जीवांना आहुती देण्यासाठी सर्वप्रथम तो स्वतःच त्यांचा बळी घेतो. आणि त्याप्रमाणे दुःख उत्पन्न करणारे तो कायाशस्त्र उगारतो.

• हे सर्व करताना तो समजतो कि मी पुण्यकर्म करीत आहे, या पुण्यकर्माने खचीतच मला स्वर्गप्राप्ती होईल. परंतु तो पापकर्म करतो, तो नरकाच्या मार्गावरुन चालत असतो.




हे ब्राह्मणा, तीन अग्नीचा त्याग करावा,, 
१. कामाग्नी, 
२. द्वेषाग्नी, 
३. मोहाग्नी




• कामाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती कामाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते. त्यामुळे तो दुर्गतीला जातो, नरकात जातो. म्हणुन हे ब्राह्मणा कामाग्नी पासुन नेहमीच दुर राहावे.







• द्वेषाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती द्वेषाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते ज्यामुळे ती दुर्गतीला जाते, नरकात जाते, म्हणुन हे ब्राह्मणा द्वेषाग्नी पासुन नेहमीच दुर राहायला हवे.




• मोहाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती मोहाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते. त्यामुळे तो दुर्गतीला जातो, नरकात जातो. म्हणुन हे ब्राह्मणा मोहाग्नी पासुन नेहमीच दुर राहावे.




भगवान पुढे म्हणाला, हे ब्राह्मणा कामाग्नी, मोहाग्नी आणि द्वेषाग्नी या तीन अग्नींचा त्याग केल्यानंतर तीन अग्नींचा सत्कार करावा, त्यांची पुजा करावी. कोणते आहे ते तीन अग्नी. 
१. आहुनेय्यग्गि, 
२. गहपतग्गि, 
३. दक्खिनेय्यग्गि...





•आहुनेय्यग्गी : माता आणि पिता हे आहुनेय्यग्गी आहेत, मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सदगुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करुन देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपतात. म्हणुन त्यांचा आदरसत्कार करावा, त्यांची पूजा करावी.





• गहपग्गि : बायको, मुलंबाळं, मित्र व नौकरचाकर हे गहपतग्गि आहेत म्हणुन त्यांचा योग्य तो आदरसत्कार करावा, औदार्याने, दाक्षिण्यानेने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे, आणि आपण स्वत:त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपदअवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या हिताला जपतात.





• दक्खिनेय्यग्गि : हे ब्राह्मणा,, श्रमण आणि ब्राह्मण हे दक्खिनेय्यग्गि आहेत, त्यांचा योग्य तो आदरसत्कार करावा.. आपल्या धर्मगुरुची सेवा काया वाचा आणि मनाने, त्याच्यावर प्रिती करुन, आपल्या घराचे दार सदैव मोकळे ठेवून व त्याच्या ऎहिक गरजा भागवून करावी कारण धर्मगुरु आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराड:मुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात.



हे ब्राह्मणा हा लाकडाचा अग्नी आहे कधी पेटवावा लागतो तर कधी विझवावा लागतो....

हे सर्व उपदेश ऐकुन तो ब्राह्मण खुप प्रभावीत झाला, त्याने सर्व प्राण्यांना मोकळे सोडले व तो भगवान बुद्धांचा उपासक झाला..

यातुन तुमचा निष्कर्ष काय...?

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


संबंधीत लेख :

यज्ञाचा खरा अर्थ भाग : १

अजीत केसकंबलाचा नास्तिकवादा

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)

रविवार, ५ जानेवारी, २०१४

यज्ञाचा खरा अर्थ (बेकारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ होय....)

भगवान बुद्धांचा यज्ञसंस्थेला असलेला विरोध जगजाहीर आहे. प्राचीन काळी वैदिक लोक ईश्वराला व देवतांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची यज्ञ करायचे आणि त्या यज्ञामध्ये अनेक प्राण्यांची आहुती द्यावी लागत असे, अशा प्रकारच्या यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध होता, परंतु ज्या यज्ञामध्ये हिंसा होत नाही अशा प्रकारच्या अहिंसक यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध नव्हता व अशा प्रकारचे यज्ञ भगवान बुद्धांना मान्य होते असा अनेक लोकांचा समज आहे. त्यांचा हा समज अगदी चुकीचा आहे.




१. हिंसक यज्ञ : हिंसक यज्ञ भगवान बुद्धांना मान्य नव्हते, प्राण्यांची आहुती देऊन केल्या जाणाऱ्या यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध होता. 


२. अहिंसक यज्ञ : अहिंसक यज्ञांना भगवान बुद्धांनी विरोध केला नव्हता कारण या यज्ञांपासुन कोणाचीही हानी होणार नव्हती.





भगवान बुद्धांनी अहिंसक यज्ञांना विरोध केला नव्हता., मगअहिंसक यज्ञ भगवान बुद्धांना मान्य होते काय...?


नाही...! भगवान बुद्धांनी जरी अहिंसक यज्ञांना विरोध केला नसला तरी ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग त्यांना मान्य नव्हता, याबद्दल आपल्याला धम्मपदातील पुढील गाथांमधुन समजते....




• मासे मासे सहस्सेन, यो यजेथ सतं समं। एकञ्च भावितत्तानं, मुहुत्तमपि पूजये। सायेव पूजना सेय्यो, यञ्चे वस्ससतं हुतं॥





→ महिनो महिने हजार यज्ञ, शंभर वर्षापर्यंत पुन्हा पुन्हा, आणी एकच विषेश प्रज्ञावंताचा क्षणभराचा सत्कार, हे पुजन श्रेष्ठ होते, शतवर्ष केलेल्या यज्ञापेक्षा..





• यो च वस्ससतं जन्तु, अग्गिं परिचरे वने। एकञ्च भावितत्तानं, मुहुत्तमपि पूजये। सायेव पूजना सेय्यो, यञ्चे वस्ससतं हुतं॥ 




→ शतवर्ष, वनात विहारणाऱ्या जीवांना यज्ञात आहुती, आणी एकच विशेष प्रज्ञावंताचा क्षणभराचा सत्कार, हे सत्कार श्रेष्ठ आहे, शतवर्ष केलेल्या यज्ञापेक्षा.





• यं किञ्चि यिट्ठं व हुतं व लोके, संवच्छरं यजेथ पुञ्ञपेक्खो। सब्बम्पि तं न चतुभागमेति,अभिवादना उज्जुगतेसु सेय्यो॥





→ या लोकात पुण्याच्या अपेक्षेने वर्षभर यज्ञ करणे, काही आहुती देणे, हे सर्व उज्वल-श्रेष्ठाला अभिवादन करण्याच्या चौथ्या भागा इतकेही नाही.


(खुद्यकनिकाय १० : १०६-१०८)


वरील गाथांवरुन आपल्याला समजते कि यज्ञ हिंसक असोत कि अहिंसक भगवान बुद्धांना कोणत्याही प्रकारचे यज्ञ मान्य नव्हते...


मग भगवान बुद्धांची यज्ञाची संकल्पना कशी होती..? याचे उत्तर आपल्याला दिग्घ निकायाच्या कुटदंत सुत्तामध्ये सापडते...




बेकारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ आहे....



एकदा कुटदंत नावाच्या ब्राह्मणाने यज्ञ करायचे ठरवले, त्या यज्ञासाठी विविध गावांमधुन निरनिराळे विद्वान ब्राह्मण आले होते, भगवान बुद्ध त्याच्या गावामध्ये विहार करत आहेत हे त्याला समजल्यावर तो ब्राह्मणांसोबत भगवान बुद्धांच्या भेटीला गेला. भगवंतांना भेटुन कुटदंतांनी त्याला नमस्कार केला. आणि म्हणाला, आपल्याला यज्ञाचा उत्तम विधी माहीत आहे, कृपया तो समजावुन सांगावा..

तेव्हा भगवंतांनी कुटदंताला पुढील कथा सांगीतली.


प्राचीन काळी एक राजा होता, एके दिवशी तो एकांतामध्ये बसला असताना त्याचा मनात असा विचार आला कि, माझ्याजवळ खुप संपत्ती आहे तिचा वापर मी महायज्ञात केला तर यामुळे मला पुण्य प्राप्त होईल आणि या पुण्याद्वारे मी चिरकाळापर्यंत सुखी बनेन. हि इच्छा त्याने त्याच्या राजपुरोहिताला सांगीतली.

पुरोहित म्हणाला, ठिक आहे महाराज, परंतु आपल्या राज्यामध्ये सध्या अशांतता आहे, गावे आणि शहरे लुटली जात आहेत, वाटसरुंना लुटले जात आहे, अशा स्थितीत यज्ञामुळे खुप आर्थिक हानी होईल आणि लोकांवर कर बसवावा लागेल अशा स्थितीत लोकांवर कर बसवला तर राज्यात अराजकता निर्माण होईल.

सर्वप्रथम आपल्याला चोरांचा बंदोबस्त करावा लागेल, जे आपल्या राज्यात शेती करु इच्छितात त्यांना बी बियाणे पुरवा, जे व्यापार करु इच्छितात त्यांना भांडवर कमी पडु देऊ नका, जे सरकारी नौकरी करु इच्छितात त्यांना योग्य वेतन द्या, याच्यामुळे सर्व कामामध्ये जातीने लक्ष दिल्याने, वेळोवेळी भरगच्च कर वसुल होऊन राज्याच्या तिजोरीमध्ये धनाची वृद्धी होईल.


राजाने पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे केले, यामुळे खुप कमी काळातच त्याचे राष्ट्र एक समृद्ध राष्ट्र बनले, दरोडे आणि चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले, त्यामुळे जास्तीत जास्त मिळणाऱ्या करामुळे तिजोरीतील धनाची वृद्धी झाली. राज्यात सगळीकडे सुखासमाधानाचे वातावरण निर्माण झाले.


काही दिवसांनंतर राजा पुरोहिताला म्हणाला,

तुम्ही सांगीतल्याप्रमाणे मी सर्व काही केले माझ्या तिजोरीतील संपत्ती खुप वाढली असुन राष्ट्रातील लोक निर्भयपणे व आनंदाने जीवन जगत आहेत. तेव्हा आत्ता मला महायज्ञ करायचा आहे.

पुरोहित म्हणाला, महाराज यद्न करण्यापुर्वी सर्वप्रथम आपण आपल्या प्रजेची परवानगी घ्यावी..

पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे राजाने प्रजेची परवानगी मिळवली.

आणि पुरोहिताने यज्ञाची तयारी केली. तो राजाला म्हणाला, या यज्ञामध्ये माझी अमाप संपत्ती नष्ट होणार आहे, असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये, यज्ञ सुरु असतानाही आपली संपत्ती नष्ट होत आहे असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये., यज्ञ संपल्यावर आपली संपत्ती यामध्ये नष्ट झाली असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये.


आपल्या यज्ञामध्ये अनेक चांगले वाईट लोक येतील पण तु चांगल्या लोकांकडे लक्ष ठेवुन आपले मन आनंदित ठेवावे.



त्याच्या यज्ञामध्ये गाय, बैल, बकरी, मेंढी, इत्यादिंची आहुती देण्यात आली नाही, झाडे तोडण्यात आली नाही, मजुरांना जबरदस्तीने काम करायला लावले गेले नाही. ज्यांना इच्छा होती त्यांनी स्वेच्छेने कामे केली, तेल, मध, लोणी, तुप आदी पदार्थांनी यज्ञ पुर्ण करण्यात आला.



यज्ञ संपल्यावर राज्यातील धनाढ्य लोक भेटवस्तु घेऊन आले. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, मला तुमच्या भेटवस्तुंची मुळीच गरज नाही धार्मिक कराच्या रुपाने माझ्याजवळ भरपुर संपत्ती जमा झाली आहे. त्यापैकी तुम्हाला काही हवे असेल तर खुशाल घेऊन जा. आणि राजाने गोरगरीबांना आपली भरपुर संपत्ती दान देण्यात वाटली.



भगवान बुद्धांकडुन हि कथा ऐकल्यावर कुटदंत आणि त्याचे ब्राह्मण मित्र म्हणाले, फारच चांगला यज्ञ... असे म्हणत ते ब्राह्मण आणि कुटदंत भगवाम बुद्धांचे उपासक बनले, व यज्ञासाठी आणलेले सातशे बैल, सातशे गोरे, सातशे मेंढ्या, व सर्व प्राण्यांना त्याने मोकळे केले...



या कथेद्वारे भगवान बुद्धांचे दोन्ही हिंसक आणि अहिंसक यज्ञाबद्दलचे मत कळते. यज्ञात प्राण्यांची आहुती देणे हे भगवान बुद्धांना मान्य नव्हते, तर केवळ यज्ञ केल्याने राज्य सुख समृद्ध बनते हा सिद्धांतही त्यांना मान्य नव्हता. तर ते यज्ञ करण्याऐवजी लोकांची बेकारी दुर करणे हाच खरा यज्ञ होय हे या कथेवरुन समजते...



निष्कर्ष : जो धर्म सुखसमृद्धीच्या इच्छेने ईश्वराला व देवतांना संतुष्ट करण्यासाठी प्राण्यांची हत्या करुन त्यांची आहुती देण्याला यज्ञ मानतो त्याच्यापेक्षा राज्यातील बेकारी दुर करायला सांगणारा मानवधर्म केव्हाही श्रेष्ठच ठरणार..


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

पूजेचा खरा अर्थ

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा...
भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण)