मार आणि बुद्ध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मार आणि बुद्ध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

यज्ञाचा खरा अर्थ (भाग २ : अजीत केसकंबल विरुद्ध भगवान बुद्ध आणि यज्ञाचा खरा विधी..)



भगवान बुद्धांचे यज्ञांच्या संबंधी काय मत होते हे आपण मागच्या भागात बघितलेच आहे, त्यांनी हिंसक यज्ञाचा खुप विरोध केला होता, तर अहिंसक यज्ञांची प्रशंसा केली होती. (कारण त्यात कोणत्याही प्राण्यांची हिंसा होणार नव्हती..) सविस्तर लेख येथे वाचा.


या भागामध्ये आपण तत्काळातील यज्ञांच्या विरोध करणाऱ्यांच्या विरोध मार्गातील फरक पाहणार आहोत.


वैदिकांच्या यज्ञांचा विरोध करणाऱ्यांमध्ये भगवान बुद्ध आणि निर्गंथ नाथपुत्र महावीर स्वामी, इत्यादी श्रमण अग्रणी होते. परंतु यज्ञ विरोधकांच्या यादीतील एक महत्त्वपुर्ण नाव म्हणजे अजीत केसकंबल.


माझ्या मागील लेखामध्ये मी अजीत केसकंबलाच्या नास्तिकवादावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उच्छेदवादी अजीत केसकंबल हा बुद्धाचा समकालीन आणि नास्तिक होता. तत्कालील श्रमण आणि ब्राह्मण हे दोन मतांचे होते : १. शाश्वतवादी आणि २. उच्छेदवादी.


शाश्वतवादी मतांचे लोक समजत होते कि आत्मा हा नित्य आहे, तर उच्छेदवादी मतांचे म्हणायचे कि पंचमहाभुतांपासुन (काही चार महाभुत मानायचे) बनलेला हा आत्मा, शरीरनाशानंतर निसर्गात आपापल्या तत्वांना जाऊन मिळतो. तो उच्छेदवादी होता.


असा हा अजीत केसकंबल उच्छेदवादी असल्या कारणाने त्याचा पाप पुण्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्याच्या पंथात नैतिकता नावाची गोष्ट नव्हती. म्हणुन तो मनाला वाटेल तसा (नैतिकतेची सीमा ओलांडुन) इतरांवर टिका करीत असे. तत्कालीन ब्राह्मणांचा, ब्राह्मण व्यवस्थेचा आणि वेदांचा तो अत्यंत कडवा विरोध होता.



अग्नीहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठन्म! बुद्धीपौरुषहीनांना जिविका धातृनिर्माता!!

अर्थ : अग्नीहोत्र, तीन वेद, त्रीदण्ड धारण करणे आणि भस्म लावणे, हे निर्मात्याने निर्मिलेली बुद्धीहीन आणि पौरुषतत्व हीन (नपुसंक) पुरुषांची उपजिविका आहे.



यज्ञातील अग्नीहोत्रामध्ये मारलेला प्राणी जर स्वर्गात जात असेल, तर यज्ञाचे आयोजन करणारा आपल्या पित्याची आहुती त्यामध्ये का देत नाही... यज्ञयागांवर अशा प्रकारच्या टिका करणाऱयांमध्ये अजीत केसकंबल अग्रणी होता.


परंतु भगवान बुद्ध मात्र यज्ञ विरोधात आंधळे होऊन आपली नैतिकता विसरत नव्हते (तर दुसऱ्यांच्या श्रद्धांना ठेस न पोहोचवता) त्या यज्ञांमधुनच ते आपल्या धर्माचा प्रचार करीत होते, लोकांना सदाचार शिकवित होते. ते कसे काय...?

भगवान बुद्ध म्हणतात, यज्ञात प्राण्यांची आहुती दिल्याने यज्ञाचा आयोजक काया, वाचा आणि मनाने अकुशल कर्मांचे आयोजन करतो. त्यामुळे यज्ञ हे अमंगल कार्य आहे असे भगवान म्हणतात.

एकदा भगवान बुद्ध एका ब्राह्मणाला यज्ञाचा खरा विधी समजावुन सांगतात अशा प्रकारची एक कथा अंगुत्तर निकायाच्या सत्तक निपातातील महायान्नवग्गातील अग्गीसुत्तामध्ये सांगतात (अ.नि. ७:५:४)


एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनात्थपिंडिकाच्या जेतवनामध्ये राहत असताना उन्मत्त शरीराच्या ब्राह्मणाने एक महायज्ञ आयोजीत केला होता. त्या यज्ञांमध्ये पाचशे बैल, पाचशे गाई, पाचशे बकऱ्यां, पाचशे मेंढरी, इ. यज्ञामध्ये आहुती दिली जाणार होती. तेव्हा तो भगवान बुद्धांजवळ आला आणि त्यांना नमस्कार करुन बाजुला बसला.

ब्राह्मण म्हणाला,, हे श्रमण गौतम यज्ञासाठी अग्नीहोत्र उभारणे आणि अग्नी पेटविणे हे खुप फलदायक आहे असे मी ऐकले आहे.

भगवान म्हणाला, होय ब्राह्मणा मी सुद्धा तसेच ऐकले आहे.

दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा ब्राह्मण हे वाक्य बोलला आणि भगवंतांनीही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले...


ब्राह्मण म्हणाला, छान गौतमा! आपले विचार किती जुळतात.

त्यावर आनंद म्हणाला, हे ब्राह्मणा तुझे वाक्य बरोबर नाही. मी असे ऐकले आहे च्या ऐवजी तु असे म्हण कि यज्ञासाठी व अग्नीहोत्र पेटविण्याची मला इच्छा आहे आणि ती पुर्ण करण्याच्या मी प्रयत्नात आहे, तेव्हा भगवंतांनी मला उपदेश करावा कि त्याच्या प्रतापाने माझे चिरकाळापर्यंत कल्याण होईल.

आनंदाच्या म्हणण्या प्रमाणे ब्राह्मणाने भगवंतांना प्रश्न विचारल्यावर भगवान म्हणाला,, हे ब्राह्मणा,, यज्ञासाठी जो अग्नीहोत्र उभारतो आणि त्यात अग्नी पेटवितो तो त्या यज्ञापुर्वी तीन प्रकारची शस्त्रे उगारतो. जे दुर्गुण, दुःखाची उत्पत्ती आणि इतर अनेक प्रकारच्या दुःखाच्या उत्पन्नाला कारणीभूत असतात.

कायाशस्त्र, वाचाशस्त्र आणि मनशस्त्र...



• जो यज्ञाला सुरुवात करतो त्याच्या मनात इतके, बैल, बकरे, मेंढरे मारले जाणार इत्यादी दुःख उत्पन्न करणारे अकुशल विचार जन्म घेतात, याप्रमाणे तो सर्वप्रथम चित्त (मन) शस्त्र उगारतो. त्यानंतर त्या सर्व जीवांना आहुती देण्याला तो स्वतःच्या तोंडाने आज्ञा देतो. अशाप्रकारे तो दुःख उत्पन्न करणारे वाचाशस्त्र उगारतो.

• त्यानंतर जीवांना आहुती देण्यासाठी सर्वप्रथम तो स्वतःच त्यांचा बळी घेतो. आणि त्याप्रमाणे दुःख उत्पन्न करणारे तो कायाशस्त्र उगारतो.

• हे सर्व करताना तो समजतो कि मी पुण्यकर्म करीत आहे, या पुण्यकर्माने खचीतच मला स्वर्गप्राप्ती होईल. परंतु तो पापकर्म करतो, तो नरकाच्या मार्गावरुन चालत असतो.




हे ब्राह्मणा, तीन अग्नीचा त्याग करावा,, 
१. कामाग्नी, 
२. द्वेषाग्नी, 
३. मोहाग्नी




• कामाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती कामाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते. त्यामुळे तो दुर्गतीला जातो, नरकात जातो. म्हणुन हे ब्राह्मणा कामाग्नी पासुन नेहमीच दुर राहावे.







• द्वेषाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती द्वेषाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते ज्यामुळे ती दुर्गतीला जाते, नरकात जाते, म्हणुन हे ब्राह्मणा द्वेषाग्नी पासुन नेहमीच दुर राहायला हवे.




• मोहाग्नी : हे ब्राह्मणा जी व्यक्ती मोहाग्नी ची गुलाम बनते ती काया, वाचा आणि मनाने अनेक दुष्कर्म करते. त्यामुळे तो दुर्गतीला जातो, नरकात जातो. म्हणुन हे ब्राह्मणा मोहाग्नी पासुन नेहमीच दुर राहावे.




भगवान पुढे म्हणाला, हे ब्राह्मणा कामाग्नी, मोहाग्नी आणि द्वेषाग्नी या तीन अग्नींचा त्याग केल्यानंतर तीन अग्नींचा सत्कार करावा, त्यांची पुजा करावी. कोणते आहे ते तीन अग्नी. 
१. आहुनेय्यग्गि, 
२. गहपतग्गि, 
३. दक्खिनेय्यग्गि...





•आहुनेय्यग्गी : माता आणि पिता हे आहुनेय्यग्गी आहेत, मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सदगुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करुन देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपतात. म्हणुन त्यांचा आदरसत्कार करावा, त्यांची पूजा करावी.





• गहपग्गि : बायको, मुलंबाळं, मित्र व नौकरचाकर हे गहपतग्गि आहेत म्हणुन त्यांचा योग्य तो आदरसत्कार करावा, औदार्याने, दाक्षिण्यानेने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे, आणि आपण स्वत:त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपदअवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या हिताला जपतात.





• दक्खिनेय्यग्गि : हे ब्राह्मणा,, श्रमण आणि ब्राह्मण हे दक्खिनेय्यग्गि आहेत, त्यांचा योग्य तो आदरसत्कार करावा.. आपल्या धर्मगुरुची सेवा काया वाचा आणि मनाने, त्याच्यावर प्रिती करुन, आपल्या घराचे दार सदैव मोकळे ठेवून व त्याच्या ऎहिक गरजा भागवून करावी कारण धर्मगुरु आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराड:मुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात.



हे ब्राह्मणा हा लाकडाचा अग्नी आहे कधी पेटवावा लागतो तर कधी विझवावा लागतो....

हे सर्व उपदेश ऐकुन तो ब्राह्मण खुप प्रभावीत झाला, त्याने सर्व प्राण्यांना मोकळे सोडले व तो भगवान बुद्धांचा उपासक झाला..

यातुन तुमचा निष्कर्ष काय...?

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


संबंधीत लेख :

यज्ञाचा खरा अर्थ भाग : १

अजीत केसकंबलाचा नास्तिकवादा

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

वैशालीची आम्रपाली : नगरवधु ते अरहंत

आम्रपाली हि बुद्धाची समकालीन होती. तिचा जन्मानंतर ती वैशालीच्या आम्रवनातील एका आंब्याच्या झाडाखाली सापडली यावरुनच तिचे नाव आम्रपाली असे पडले. महानाम नावाच्या पहारेकऱ्याने आम्रपालीचे पालन पोषण केले.



आम्रपाली लहानपणापासुनच सौंदर्यवान होती.
जसे जसे तिचे वय वाढत गेले तसे तसे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत गेली. तिचे ते असामान्य सौंदर्य, लावण्य, भुरळ लावणारी मादकता, या सर्वांनी संपुर्ण वैशाली शहराला मोहीनी लावली होती. वैशाली हे लिच्छवींच्या राजधानीचे शहर होते.



आम्रपाली केवळ अकरा वर्षाचीच असताना राष्ट्रातील सर्वात सुंदर स्त्री असे घोषीत करण्यात आले होते. तिच्या सौंदर्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे आकर्षण होते. सौंदर्य, साहस, तेज इत्यादी गुणांचा तिच्यात समन्वय होता. वैशालीचे राजकुमार तिच्यावर मोहित झाले होते. सर्वच्या सर्वच तिच्याशी लग्न करण्यास उत्सुक होती. वैशालीच्या कायद्यानुरार ती कोणाशीही लग्न करु शकत नव्हती. त्यामुळे तिला 'वैशालीची नगरवधू' घोषीत करण्यात आले. या घोषणेचा तिने खुप विरोध केला, त्याचा धिक्कार केला.....




भगवान बुद्धांसोबत भेट....



एकदा भगवान बुद्ध वैशाली मध्ये विहार करीत आहेत, हे वर्तमान कळताच ती भगवान बुद्ध आणि त्यांच्या संघाला जेवनाचे आमंत्रण दिले आणि तथागतांनी ते स्वीकारले. हे ऐकुन ती आनंदाने तिथुन निघुन गेली वाटेत तिला लिच्छवी भेटले. त्यांनी आम्रपालीला याबद्दल विचारले असता ति म्हणाली, 'उद्या माझ्याकडे भगवान बुद्ध भिक्खुसंघा सोबत जेवन करण्यासाठी येत आहेत. हे ऐकुन राजकुमारांना सुद्धा आश्चर्य वाटले. ते म्हणाले, भगवंताचा भोजनाचा कार्यक्रम तुझ्या ऐवजी आमच्याकडे ठेव त्याच्या बदल्यात मी तुला एक लाह सुवर्ण मुद्रा देतो.





त्यावर आम्रपाली म्हणाली., हे आर्यपुत्रांनो..! तुम्ही मला या मोबदल्यात पुर्ण वैशालीचे राज्य दिले तरी या जेवनाचे यजमानपद मी तुम्हाला देणार नाही... यावरुन आम्रपालीची श्रद्धा दिसुन येते.



या मंगल प्रसंगी धम्मदेशना करताना भगवान म्हणाले,, सर्व प्राणिमात्रां विषयी मैत्री भाव ठेवणे, करूणेची भावना ठेवणे व जगातील सर्व प्राण्यांप्रती समता बाळगणे हाच खरा धर्म आहे....



भगवान बुद्धांनी आम्रपालीला अनित्यवादाचा उपदेश देताना सांगीतले,, हे संपुर्ण जग व त्यातील सर्वच भौति व चैतन्यमय वस्तु या सर्व परिवर्तनशील व अनित्य आहेत, अस्थीर व अस्थाई आहेत.


या बहुमोल उपदेशाचा आम्रपालीच्या मनावर अतिशय खोलवर परीणाम झाला व तिच्या मनात भगवंताच्या धम्माविषयी खुप श्रद्धा निर्माण झाली व तिने त्यांच्या हस्ते परिव्रज्या धारण केली व ती भिक्खुणी संघात सामील झाली....



तिने आत्मचिंतन केल्यावर तिला समजले कि, आपले सौंदर्य, लावण, तारुण्य हे अस्थाई आहे, माझे शरीर दुर्गंधीचे केंद्र आहे. हे सौंदर्य नश्वर आहे, ते नष्ट होऊन वार्धक्य येणार आहे व शेवटी हे शरीर नष्ट होणार आहे...



या अनित्याच्या मुद्यावर ती थेरीगाथे मध्ये लिहिते... मी (पियुष खोब्रागडे) भाषांतरीत केलेल्या आम्रपालीच्या गाथा पुढीलप्रमाणे :



१. माझे केस काळे होते, अगदी मधमाशांच्या रंगाप्रमाणे, टोकावरुन निमुळते असे माझे केस वयानुसार तंतु देणाऱ्या वनस्पती प्रमाणे झाले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


२. आल्हाददायक, सुवासीक फुलांनी भरलेल्या टोपलीतुन वयानुसार (कालांतराने त्यामधुन) प्राण्यांच्या अंगावरील लोकरीप्रमाणे दुर्गंध येऊ लागला ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


३. घनदाट आणि समृद्ध अशी वृक्षवाटिका, भव्य आणि उत्कृष्ट योजनेनी आखलेली अगदी मधाच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे ; वयानुसार (कालांतराने) असमृद्ध आणि विरळ बनला परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


४. सोन्याच्या दागिन्यांनी अलंकार करुन उत्कृष्ट दागिन्यांनी सजविलेली वेणी, वयानुसार तेथे टक्कल पडले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


५. अगदी चित्रकाराने काढलेल्या चित्राप्रमाणे उत्कृष्ट अशा माझ्या भुवया अतिशय सुंदर होत्या. वयानुसार त्या खचक्या ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


६. तेजस्वी, उज्वल आणि प्रखर रत्नाप्रमाणे माझे डोळे होते, वयानुसार ते तेजस्वी राहिले नाही ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


७. नाजुक शिखराप्रमाणे माझे नाजुक नाक अतिशय सुंदर आणि युवांमध्ये उत्कृष्ट होते. वयानुसार ते लांब मिरीप्रमाणे झाले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


८. अतिशय लोकप्रिय आणि अद्ययावत पद्धतीच्क्षा कंगणाप्रमाणे माझे कान अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते खाली खचले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


९. कळ्यांच्या शुभ्र रंगाप्रमाणे माझे दात अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते पिवळसर पडले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


१०. घनदाट अरण्यातील कोकीळ पक्ष्याप्रमाणे माझ्या आवाजाचा स्वर होतो, वयानुसार तो बिघडला ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.


११. गुळगुळीत - शंखाप्रमाणे निर्दोष अशी माझी मान उत्कृष्ट होती, वयानुसार ती भ्रष्ट झाली ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१२. दरवाज्याच्या गोलाकार दांड्याप्रामाणे माझ्या दोन्ही भूजा अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होत्या, वयानुसार त्या पाटली वृक्षाप्रमाणे वाळल्या ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१३. सोन्याच्या अलंकाराने सजवलेले आणि अंगठी घातलेले माझे नाजुक हात अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते कांद्याप्रमाणे बनले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१४. विस्तारलेले, गोलाकार, टणक, कणखर आणि उंच असे माझे दोन्ही स्तन एकेकाळी अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, म्हातारपणाच्या अनावृष्टीमुळे रिकाम्या अशा जुन्या पाण्याच्या पिशव्याप्रमाणे लटकत आहेत ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१५. सोन्याच्या पत्र्याप्रमाणे असे (तेजस्वी) चकचकीत, सुंदर आणि उत्कृष्ट असे माझे शरीर, वयानुसार सुरकुत्यांनी झाकाळले गेले आहे ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१६. हत्तीच्या सोंडेप्रमाणे अत्यंत मऊ व गुळगुळीत अशा माझ्या दोन्ही मांड्या अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होत्या, वयानुसार ते वेळूप्रमाणे झाले आहेत ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१७. सोन्याच्या अलंकाराने सजविलेले, सोन्याची साखळी घातलेले माझे नाजुक सांध अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते शिसमच्या काडीप्रमाणे झाले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.


१८. जणुकाही मऊ कापसाने बनलेल्याप्रमाणे माझी पाय अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार त्यात शुष्क होऊन भेगा पडल्या ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही....


१९. असे हे शरीर प्रत्यक्ष कचऱ्याचे ढीग होते :

घराच्या (शरीराच्या) बरगड्या मोडल्या आहेत, छप्पर नष्ट झाले आहे ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही....


भगवान बुद्धांच्या धर्मावर श्रद्धा ठेऊन त्यानुसार आचरण केल्यामुळे आम्रपाली बुद्धांच्या धर्मात आणि बौद्ध इतिहासात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले... नगरवधू पासुन तिने अरहंतपद प्राप्त करुन घेतले...

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)




जयमंगल अष्टगाथा अर्थात भगवान बुद्धांचे आठ मोठे विजय ज्यांना Stanzas of Victory असेही म्हणतात. या जयमंगल अष्टगाथांचे बौद्ध तत्वज्ञानात खुप महत्व आहे. जयमंगल अष्टगाथा व त्यांच्या कथा या लेखमालिकेत आपण त्या आठ विजयांबद्दल सविस्तर माहीती, त्यांच्या गाथांमागे असलेल्या कथा काय आहेत ते पाहुया... त्या कथांमधुन तुम्ही योग्य तो बोध घ्यावा..... 


जयमंगल अष्टगाथा मधल्या पहिल्या गाथेमध्ये माराची गोष्ट सांगीतली आहे ती याप्रमाणे,,,





बाहुं सहस्समभिनिम्मित सायुधंतं
गिरिमेखलं उदित-घोर-सरेन मारं
दानादि धम्म विदिना, जितवा मुनिंदो,
तं ते जसा भवतु ते जयमङ्गलानि



ज्या मुनींद्राने अत्यंत तीक्ष्ण हत्यार घेऊन सहस्रबाहु, गिरिमेखलं नावाच्या हत्तीवर आरुढ झालेल्या व अत्यंत भयानक व अफाट सेनेसह आलेल्या माराला आपल्या दान आदि धर्मबळाने जिंकले,, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...



मारावर विजय



परिव्राजक सिद्धार्थ बुद्ध होण्याच्या तयारीत आहेत, हे पाहून माराला अतिशय वाईट वाटले. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला आजपर्यंत कोणत्याही श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माझा पराजय केला नाही. परंतु हा श्रमण गौतम खुप दृढनिश्चयी दिसतो, हा माझा अपमान करुन माझ्यापासुन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत आहे, मला याचे वेळीच दमन करायला हवे, नाहीतर तो माझ्या हातुन कायमचा सुटेल व माझ्यविरुद्ध बंड करुन उठेल. असा विचार करुन माराने त्याच क्षणी आपली सेना तयार केली.


अशा प्रकारे आपल्या अफाट सेनेला पुढे पाठवुन मार गिरीमेखल नावाच्या हत्तीवर आरुढ होऊन त्यांच्या मागोमाग आला. इकडे माराच्या अफाट सेनेने बोधीसत्त्वाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्टा केली होती. आपल्या शस्त्रांचा वर्षाव त्यांनी बोधीसत्वावर चालवला होता. परंतु त्या शस्त्रास्त्रांची फुले बनुन बोधीसत्त्वाच्या अंगावर येऊन पडत होती. कोणतीच शस्त्रास्त्रे बोधीसत्वाच्या अंगावर काहीच परिणाम करु शकत नव्हती. मारालाही कळुन चुकले होते कि आपल्या अफाट सेनेचा पराभव निश्चित आहे, त्याला त्याच्या सेनेचा पराभव दिसत होता, तेव्हा त्याने आपल्या पराभवाने वादळ उत्पन्न केले. आसपासचे वृक्ष कोसळु लागले, पशूपक्ष्यांचा एकच आक्रोश सुरु झाला. परंतु बोधीसत्व आपल्या समाधीपासुन तीळमात्रही ढळला नाही.


तेव्हा बोधीसत्वाला पाण्याने बुडवुन मारीन म्हणुन त्यान पाऊस पाडला, जिकडे तिकडे महापुर आणला परंतु पाण्याचा एकही थेंब बोधीसत्वाला स्पर्श केला नाही.


त्यामुळे व्यथीत झालेल्या माराने सहा प्रकारच्या वृष्टी उत्पन्न केल्या परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. हे पाहुन मार अतिशय खिन्न झाला. तरीसुद्धा त्याने प्रयत्न करणे सोडले नाही. त्याने भयानक काळोख उत्पन्न केला, ती वैशाख शुद्ध पोर्णीमेची रात्र होती. पोर्णीमेच्या चंद्राने आणि चांदण्याने रात्र खुप प्रकाशलेली होती. परंतु माराने बोधीवृक्षाजवळ भयानक अंधकार पसरविल्या कारणाने, माराचा गिरीमेखल हत्ती व जवळपासची पर्वतशिखरे घुबडांना दिसेनाशी झाली. परंतु बोधीसत्वाच्या प्रज्ञारुपी प्रदीपापुढे माराचा अज्ञान रुपी अंधकारचा नायनाट केला.


आजपर्यंत त्या माराला पराभव काय आहे, हे माहीतच नव्हते, आजपर्यंत त्याचा कधीच पराभव झाला नव्हता. जरी एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माराविरुद्ध युद्ध पुकारले तरी मार आपल्या एखाद्या तुकडीला पाठवुन त्याचा तेव्हाच पराभव करायचा.


श्रमण गौतम साधारण तपस्वी नव्हता हे जाणुनच माराने आपल्या सैन्याला त्याच्यावर तुटुन पडायच्या आज्ञा केल्या होत्या, परंतु आपल्या अफाट सेनेला बोधीसत्व चारी मुंड्या चित करल हे त्या जाणले नव्हते. आपली सर्व शक्ती पणाला लावुन देखील तो बोधीसत्वाला आपल्य मार्गापासुन क्षणभरही विचलीत करु शकला नव्हता, आता परभवाची वार्ता घेऊन माघारी जाण्यापेक्षा बोधीसत्वावर हल्ला करणे माराला योग्य वाटले. तेव्हा मार आपल्या गिरीमेखल हत्तीवरुन खाली उतरला आणि बोधीसत्वाला म्हणाला सिद्धार्था इथुन मुकाट्याने चालता हो, नाहीतर एका क्षणात तुझा नाश करेन.

तेव्हा बोधीसत्व म्हणतो, हे पापी मारा, तुझ्या सैन्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चैनीच्या वस्तु हि तुझी सर्वात पुढे जाणारी तुकडी आहे. तहान, भुक, तृष्णा, आळस, गर्व, किर्तीची आशा, आत्मस्तुती आदी, ह्या तुकड्या त्यामागोमाग येत असतात. कच्च्या मातीचे भांडे जसे फोडतात त्याप्रमाणे मी तुझ्या सैन्याचा पराभव करेन.


हे ऐकुन मार म्हणाला, त्या सर्व गोष्टींना जाऊदे,, आधी तु ज्या आसनावर बसला आहेस, तिथुन उठ ते माझे आसन आहे. चल ताबडतोब चालता हो इथुन. त्यावर बोधीसत्व म्हणाला, कशावरुन तु म्हणत आहेस कि हे तुझे आसन आहे, याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे काय? हा प्रश्न ऐकुन माराच्या सेनेतील अनेक लोक योध्ये म्हणायला आहोत कि आम्ही साक्षी आहोत. तेव्हा पापी मार बोधीसत्वाला म्हणाला कि, सिद्धार्था हा माझा पुरावा आहे, चल आता इथुन मुकाट्याने चालता हो. त्यावर बोधीसत्व म्हणाला कि मी अनेक जन्मी दानपारमिता पुर्ण करुन या आसनावर बसण्याचा अधिकारी बनलो आहे, यावर मार म्हणाला याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे.


तेव्हा बोधीसत्व म्हणाला हि पृथ्वी साक्षी आहे, हि वसुंधरा साक्षी आहे. याचबरोबर तिथे एक देवता प्रगट झाली आणि तिने साक्ष दिली कि, श्रमण गौतमाने अनेक जन्म घेऊन दानपारमिता पुर्ण केली याबाबत साक्ष दिली. येवढे बोलुन त्या देवतेने आपले ओले केस पिळले आणि त्या प्रवाहाबरोबरच आपल्य अफाट सेनेसह व गिरिमेखल हत्तीसोबत मार वाहुन गेला. माराची झालेली दुर्दशा पाहुन देवांगण बोधीवृक्षाजवळ जमले आणि त्यांनी सिद्धार्थावर पुष्पवृष्टी केली. तेव्हा बोधीसत्वाने पुढील गाथा म्हटली,,



अनेकजातिसंसारं संधाविस्सं अनब्बिसं गहकारकं गवेसन्तो दुक्खा जाति पुनप्पुनं।गहकारकं दिट्टो ऽसि पुन गेहं न काहसि सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं
विसंखारगतं चितं तव्हानं स्वयमज्झगा।




धम्मपदाच्या १०३ ऱ्या गाथेद्वारे भगवान बुद्ध आपल्याला सांगतात,,


यो सहस्सं सहस्सेन, सङ्गामे मानुसे जिने। एकञ्च जेय्यमत्तानं स वे सङ्गामजुत्तमो॥

जो युद्धात लाखो जेत्यांना जिंकतो (त्या जेत्याहुन), जो एक स्वतःला जिंकतो, तो उत्तम युद्धजेता होय.


खरच तो सर्वश्रेष्ठ विजेता होता.. ज्याने स्वतःलाच जिंकले...



बाहुं सहस्समभिनिम्मित सावुधंतं,
गिरिमेक्खलं उदित-घोर-ससेन मार
दानादि धम्मविधिना जितवा मुनिंदो
तं ते जसा भवतु ते जयमङलानि




ज्या मुनिंद्राने तीक्ष्ण व बळकट हत्यारे धारण केलेल्या सहस्र बाहुबळ निर्माण करुन गिरीमेखल नावाच्या मस्त हत्तीवर बसुन अनंत, भयानक व अफाट सेनेसह माराला क्षणातच आपल्या दानादी धर्मबळाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.


सुचना : हे युद्ध बोधीसत्वाच्या मनातील चांगले विचार विरुद्ध वाईट विचार असे होते, त्याला अलंकारीक रीत्या सजवले आहे.


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :

१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)


२. भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे.. (धम्मगुण - नक्की वाचा)


३. मराठी धम्मपद


४. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

५. बुद्ध वंदना : मराठी