गैरसमज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गैरसमज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

धम्माच्या बाबतीत असलेले गैरसमज... - भाग ३

आमचे फेसबुक वरील मित्र संजय क्षीरसागर यांनी भगवान बुध्दांच्या धम्माच्या संबंधाने काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी सदर लेख लिहिला आहे. ह्या लेखामध्ये संजय क्षीरसागर यांचे प्रश्न व त्यांना माझ्याद्वारे दिल्या गेलेली उत्तरे यांचा समावेश केला अाहे..



संजय क्षीरसागर- यांची पोस्ट
एक विनंती :- प्रथमतः पोस्ट पूर्ण वाचा आणि मगच like ऑप्शन युझ करा. तसेच काही सूचना असल्यास, चुकीची बाब असल्यास कॉमेंट मध्ये नोंदवा. पण केवळ काड्याच घालायच्या म्हणून उगवणार असला तर .. तर मग खैर नाही.
==================================================

गौतम बुद्धाची चार आर्यसत्ये :- (१) दुःख (२) तृष्णा (३) दुःखनिरोध (४) दुःखनिरोधगामिनी प्रतिपद् अष्टांग मार्ग

अष्टांग मार्ग :- (१)सम्यक दृष्टी, चार आर्यसत्यांचे यथार्थ ज्ञान (२) सम्यक संकल्प (३) सम्यक वाचा (४) सम्यक कर्मान्त (५) सम्यक आजीविका (६) सम्यक व्यायाम (७) सम्यक स्मृती (८) सम्यक समाधी  

पंचशील तत्वे :- (१) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे (२) चोरी न
करणे (३) व्यभिचार न करणे (४) असत्य न बोलणे (५) मादक पेय ग्रहण न करणे

डॉ. आंबेडकरांनी आपल्या ' बुद्ध आणि त्याचा धम्म ' या ग्रंथाच्या प्रास्ताविकात गौतम बुद्धाच्या चार आर्यसत्यांवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, त्या अनुषंगाने हा चर्चेचा व्याप आरंभला आहे.

सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि, गौतम बुद्धापूर्वीपासून या देशात श्रमण परंपरा अस्तित्वात होती. या श्रमणांचे सुमारे साठहून अधिक संघ असल्याचे श्री. धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ' भगवान बुद्ध ' या ग्रंथाच्या प्रथम खंडात नमूद केले असून खुद्द गौतमच्या काळात निर्ग्रंथ ( जैन ), पुरणकाश्यप, मक्खलि गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कात्यायन, संजय बेलठ्ठपुत्त हे सहा मोठे श्रमण संघ अस्तित्वात होते.

गौतमाने गृहस्थाश्रमाचा त्यागून संन्यास घेतला त्यावेळी आरंभीच्या काळात त्याने जी काही
तपश्चर्या आरंभली ती पूर्वपार परंपरेने चालत आलेल्या पद्धतींनुसार. ज्याचे वर्णन कित्येक बुद्ध चरित्रांत मिळते. परंतु इथे लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब म्हणजे गौतम किंवा इतर श्रमणांना विरक्ती का यावी ? संन्यासाकडे त्यांचा ओढा का असावा ?

मानवी जीवन अस्तित्वात आल्यापासून आपल्या अस्तित्वाच्या कारणाचा शोध घेण्याची धडपड अव्याहतपणे सुरु आहे. आपण ज्या काळाचा विचार करत आहोत, त्या काळात या प्रश्नाचा शोध घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संन्यास, तपश्चर्या. यामागे आत्मज्ञान वा इच्छित देवतेची भेट, दर्शनप्राप्ती वगैरे जी काही भावना असेल ती असेल.

 याच अनुषंगाने विवेचनातून सुटत असलेला दुसरा मुद्दा म्हणजे मानवी जीवनातील दुःख. जगातील प्रत्येक धर्माचे आध्यात्मिक अस्तित्व मानवी जीवनातील दुःखावरच अवलंबून आहे.
वास्तविक धर्माचे मुख्य प्रयोजन म्हणजे मानवी जीवनाचे, समूहाचे नियमन करणे. परंतु ऐहिक जीवनातील समस्यांच्या निवारणार्थ आध्यात्म वा दैवी घटकांचा आश्रय घ्यावाच लागतो कारण निव्वळ बुद्धिवाद हा वास्तव जीवनात उपयोगी पडत नाही. असो.

गौतम व त्याचे समकालीन तसेच पूर्वसुरी याच कारणांनी, मानवी जीवन अस्तित्वाचे प्रयोजन व मानवी जीवनातील दुःख, संन्यासाकडे वळले होते. प्रचलित मार्गांनी त्यांनी या प्रश्नांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न केले. पैकी येथे आपण चर्चा करणार आहोत गौतम बुद्धाच्या चार आर्यसत्य, अष्टांग मार्ग व पंशशील तत्वांची.

उपरोक्त तिन्ही घटकांचा बारकाईने विचार केला असता असे लक्षात येते कि, यातील चार आर्यसत्ये हि फक्त संन्यासी / श्रमणांना लागू होतात. गृहस्थाश्रमातील व्यक्तीस नाही. कारण हि चार आर्यसत्ये गृहस्थास लागू होतात असे मान्य केले तर मग गृह्स्थाश्रमाचा मुख्य आधारच तुटतो. किंबहुना या चार आर्यसत्यांत संन्यस्त वृत्तीचाच उघड पुरस्कार केल्याचे स्पष्ट होते. मग प्रश्न असा उपस्थित होतो कि, पंचशील तत्व व अष्टांग मार्गाची आवश्यकता का भासावी ?

गौतम हा श्रमण होता. त्यामुळे आर्यसत्यांवरच तो थांबला असता तरी ते पुरेसे होते. परंतु ज्या कारणांस्तव त्याने व त्याच्या समकालीन तसेच पूर्वसुरींनी श्रमणपरंपरेचा स्वीकार केला होता त्याचे निवारण करणे, निरसन करणेही त्यांस आवश्यक होते. यामुळेच पंचशील तत्वांची उभारणी करण्यात आली. ज्यान्वये गृह्स्थाश्रमी व्यक्तीचे जीवन व्यतीत होऊन उपरोक्त आर्यसत्यांनी ते बाधित न होता, संन्यस्त वृत्तीकडे न वळता गृहस्थाश्रमातच व्यतीत व्हावे.
इथे वादाचा मुद्दा हा होऊ शकतो कि, पंचशील तत्वे व अष्टांग मार्ग यातील प्रथम कोण ? याचे निर्णायक उत्तर माझ्याकडे तरी नाही परंतु अष्टांग मार्गांचे अध्ययन केले असता त्यातील विफलता लक्षात येऊन पंचशील तत्वेच मला आधारभूत वाटतात.

याचे मुख्य कारण म्हणजे अष्टांग मार्गांची उभारणीच मुळी चुकीच्या गृहितकावर झालेली आहे. अष्टांग तत्व सांगताना सर्व मनुष्य एकाच प्रवृत्तीने, एकाच विचाराने, बुद्धीने वागतील हे गृहीत धरण्यात आलेलं आहे जे मानवी स्वभाव वैविध्य, वैचित्र्य व वैशिष्ट्य लक्षात घेता अनैसर्गिक आहे.
त्याउलट पंचशील तत्वात काय करावे अन् काय करू नये याचे स्पष्ट निर्देश आहेत. असो.

गौतम बुद्ध व इतर श्रमणांनी जी काही तत्वे उभारली त्यांचा अंतिम हेतू मानवी जीवन सुखमय व्हावे हाच होता. त्यामुळे या तत्वांचा सर्त्व धर्मियांनी, विशेषतः जे हिंदू धर्मियांच्या निकट सानिध्यात आले त्यांनी, आपापल्या शक्तीनुसार स्वीकार केला. याबाबतीत वैदिक धर्मियांचे उदाहरण महत्वपूर्ण असून अभ्यासूंनी याकरता मनुस्मृतितील वानप्रस्थ तसेच संन्यासाश्रम प्रकरण वाचावे अशी मी सूचना करतो.

यास्थळी आणखी एक उद्भवणारा प्रश्न म्हणजे बौद्ध हा धर्म आहे का ? याचे उत्तर माझ्या मते नकारार्थीच ठरते. कारण -- (१) गौतमने याची स्वतंत्र धर्म म्हणून उभारणी केली नाही (२) गौतमने जी काही तत्वनिर्मिती केली ती श्रमणावस्थेत. त्यामुळे यास धर्म म्हणावे तर मग तो संन्याश्यांचा धर्म ठरतो, गृहस्थांचा नाही. व ज्या धर्मात गृह्स्थाश्रमास स्थान नाही तो मुळी धर्मच होऊ शकत नाही. (३) खेरीज गौतमच्या हयातीत प्रचलित पद्धतीनुसार श्रमणसंघ प्रवेश हेही एक कारण आहेच.
मग प्रश्न उपस्थित होतो, बौद्ध धर्म नाही तर काय आहे ? याचे उत्तर अनेकांनी अनेकवेळा दिलेलं आहे कि, बौद्ध हि एक जीवनपद्धती आहे. आपल्या नित्य परिचयाचे यासंबंधी दुसरे उदाहरण म्हणजे वारकरी संप्रदाय. असो.

डॉ. आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा मी माझ्या परीने उत्तर शोधण्याचा यत्न केला आहे. अर्थात हा परिपूर्ण नाही याची मला जाणीव आहे परंतु यानिमित्ताने एका दुर्लक्षित विषयावर किमान चर्चा तरी घडेल अशी निष्फळ अपेक्षा आहे.



माझ्याद्वारे दिले गेलेले उत्तर :


सर तुमचा लेख चुकीच्या आधारावर लिहिला आहे, माझ्या परीने  एक - एक मुद्दा पकडून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करित आहे...


पूर्वीच्या काळात स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ तर मोक्ष प्राप्तीसाठी तपश्चर्या केली जायची, यातील मोक्ष हि संकल्पना श्रमण परंपरेतील होती हे आपण जाणतोच. भगवान बुध्दांच्या काळात अस्तित्वात असलेल्या ६२ श्रमण परंपरांच्या द्वारे ह्या मोक्ष प्राप्तीसाठी विविध प्रकारच्या तपश्चर्या केल्या जायच्या, त्यांच्या मार्गामध्ये समानता नव्हती. जसे - कुक्कुर व्रतिक (कुत्र्याच्या खाण्यापिण्याचे व्रत करणारे) गोव्रतिक (गायी सारखे जीवन जगणारे) , अचेलक (नग्न राहणारे), विष्ठा खाऊन जगणारे अशा अनेक प्रकारच्या तपश्चर्या होत्या. सिध्दार्थ गाैतम बोधीसत्त्व अवस्थेत असतांना त्यांनी सुध्दा तिळाच्या एका दाण्यावर जीवन जगून, श्वास कोंडून विविध प्रकारच्या तपश्चर्या करण्याचा प्रयत्न केला पण ते त्यामध्ये यशस्वी झाले नाही, शेवटी वैराग्याच्या त्या मार्गाचा त्याग करुन सम्यक समाधी लावली. आणि त्याच मार्गाने सम्यक संबोधीची प्राप्ती केल्यानंतर आपल्या धर्माचा उपदेश करतांना त्यांनी अशा तपश्चर्यांना नाकारले आहे, त्यांना मिथ्या मार्ग संबोधले आहे. चित्त शुध्द नसतांना अशा तपश्चर्यांना काहीच अर्थ नाही.


भगवान बुध्दांनी धर्माचा शॊध घेण्यासाठी बोधीसत्त्व असतांना सन्यांस स्वीकारला होता. पण निर्वाणाकडे घेऊन जाणाऱ्या ह्या धर्मयानावर आरुढ होण्यासाठी संन्यास स्वीकारण्याची गरज नाही. भगवान बुध्दांनी गृहस्थी जीवनात जगणाऱ्या लोकांसाठी हा मार्ग शॊधला आहे, ज्याचा साक्षात्कार कोणी गृहस्थाश्रमात राहून सुध्दा करु शकतो.


दुःख : तुमच्या अर्थानुसार प्रत्येक धर्म हा मानवी जीवनात असलेल्या दुःखांवरच बोलतो आणि त्यातुन सुटण्याच्या मार्गावर. पण दुःखातून सुटण्यासाठी ते कोणत्या प्रकारचा मार्ग सांगतात त्यांची काही उदाहरणे :

१. भक्ती : हा मार्ग सामान्यतः ईश्वराच्या भक्तीवर आधारीत आहे, त्यांच्या धर्मानुसार ईश्वर हा भक्तीप्रिय आहे. जर तुम्ही त्याची भक्ती कराल तरच तो तुमच्या जीवनातील दुःख नष्ट करेल, पण जर तुम्ही त्याच्या भक्तीपासुन दुर जाण्याचा प्रयत्न कराल, तर तो तुमच्या जीवनाला विविध प्रकारच्या दुःखांनी भरवून टाकेल.

२. पाैराणिक तपश्चर्या : पाैराणिक कथांमधील तपश्चर्या जरा वेगळ्या अर्थाच्या होत्या, त्यांच्यानुसार तपस्वी ईश्वराला खुश करण्यासाठी तपश्चर्या करित असत.

३. श्रमणांची तपश्चर्या याहून वेगळी होती. त्यांच्यानुसार सामान्य मानव हा अगदी सामान्य जीवन जगतो, त्याचा त्याला काही विशेष लाभ नाही. जर सत्याची प्राप्ती करायची असेल तर मला त्याच्यापेक्षा वेगळे जीवन जगावे लागेल ह्या दृष्टिकोनातून श्रमण लोक तपश्चर्येकडे वळत असावेत.

४. यज्ञ : ऎहिक जीवनात उत्तम फळाची प्राप्ती तसेच मेल्यानंतर स्वर्गात जन्म या कामनेतुन यज्ञ केले जायचे.

 त्याचप्रमाणे असे अनेक मार्ग अस्तित्वात आहेत, पण भगवान बुध्दांचा धर्म मात्र दुःखातून मुक्तीसाठी वेगळ्या प्रकारचा मार्ग सांगतो. दुःखातून मुक्ती व्हावी या इच्छेने ईश्वराची भक्ती करणे, सर्व पापकर्मांना नष्ट करण्यासाठी नदी मध्ये स्नान करणे यामध्ये काही शाैर्य लागत नाही. पण दुःखमुक्तीसाठी भगवान ज्या मार्गाचा उपदेश करतात त्यावर चालण्यास शाैर्य लागते. आपल्या मनातील राग, लोभ, द्वेष, मत्सर, ईर्षा, कामवासना यांच्या सारख्या वाईट विचारांवर विजय मिळविण्यासाठी शाैर्य लागते, भगवान बुध्द आपल्याला हाच मार्ग सांगतात.


ना मांस माशांचा आहार ग्रहण केल्याने, ना नग्न राहिल्याने, ना मुंडण केल्याने, ना जटा वाढविल्याने, ना चिंध्या परिधान केल्याने, ना शरीरावर धुळ माखल्याने, ना वेदांचे अध्ययन केल्याने, ना अग्नीहोत्रात आहुती दिल्याने अंधकारात डूबलेल्या मानवाचे मन अंधकारातुन बाहेर पडेल.. - भगवान बुध्द


चार आर्यसत्ये हे सर्वकालीन व सर्व प्रकारच्या जीवांच्या जीवनातील सत्ये आहेत, त्यांच्यामुळे गृहस्थ जीवनाचा गाभा तुटतो असे नाही. भगवान बुध्दांनी उपदेश केलेले आर्यसत्ये हे शाश्वत सत्ये तर आहेतच पण गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांसाठी त्यांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे नाही (तरीसुध्दा ते त्यांच्या जीवनासाठी सत्येच आहेत) दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्गामध्ये केलेली तुलना चुकीची आहे, त्यांचा एकमेकांशी संबंध येत नाही.  प्रज्ञा,  शील आणि समाधी यांना धर्मामध्ये अधिक महत्व आहे. यातील प्रज्ञा आणि शील ह्या पारमिता आहेत तर समाधी आर्य अष्टांगिक मार्गातील आठवे अंग. त्यामुळे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ज्यांची तुलना होऊ शकत नाही. केवळ सदाचाराने (शीलाने) निर्वाणाची प्राप्ती होऊ शकत नाही, आर्य अष्टांगिक मार्ग हा महत्वाचा आहे, जो केवळ परिव्राजकांच्या साठी नसून सर्वच जीवांच्या साठी आहे. गृहस्थांसाठीच्या पंचशीलांची तुलना श्रामणेरांच्या १० शीलांशी व भिक्खुंच्या २२७ विनयांशी करता येईल. ते शील निर्वाणाच्या प्राप्तीसाठी नसून सदाचारी जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहेत. भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म हा केवळ परिव्राजकांच्या साठी नसून तो गृहस्थांच्या साठी सुध्दा आहे कोणी गृहस्थी जीवनात सुध्दा आर्य अष्टांगिक मार्गावर चालून निर्वाणा पर्यंत पोहोचू शकतो. भगवान बुध्दांनी गृहस्थांना सुद्धा अनेक सुत्तांमधून  मार्गदर्शन केले आहे.

तुमच्या प्रश्नांची उत्तरे :

१. बोधीसत्वाने सम्यक संबोधीच्या प्राप्तीनंतर सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये धर्मचक्राचे प्रवर्तन केले, आपल्या द्वारे जाणल्या गेलेल्या धर्माचा सर्व जगाच्या कल्याणासाठी संघाची निर्मिती केली तरी सुध्दा त्यांनी धर्माची स्थापना केली नाही असे म्हणता..

२. भगवान बुध्दांनी जे काही उपदेश केले ते सामान्य श्रमण अवस्थेत नसून सम्यक संबुध्द अवस्थेत केले, त्यामुळे ते सर्व प्रकारच्या जीवांसाठी केले - मग ते परिव्राजक असोत किंवा गृहस्थ..

अ) आर्यसत्ये तर शाश्वत सत्ये आहेत, पण त्यांचे आकलन करण्याचा गृहस्थांचा आणि परिव्राजकांचा मार्ग वेगळा आहे. त्यांचे उपदेश हे केवळ परिव्राजकांसाठी नसून गृहस्थांच्या साठी सुध्दा होतेच.

ब) भगवान बुध्दांच्या द्वारे केल्या गेलेल्या  कित्येक गृहस्थांना केलेल्या उपदेशातुन त्यांच्या धर्मात गृहस्थी जीवनाचे असलेले महत्व अधोरेखीत होते.

३. तिसरा प्रश्न बरोबर समजला नाही, कृपया स्पष्ट करा...


मला वाटते तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर सुध्दा वर सापडले असेल, भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म केवळ विशिष्ट आचार पद्धतींचे आचरण करणाऱ्या लोकांचा पंथ किंवा संप्रदाय  नव्हे तर सम्यक संबुध्दांनी (संपुर्ण जागृत) अनुभव केलेले निसर्गाचे नियम आहेत, मानवाच्या कल्याणासाठी उपदेश केलेला तो मार्ग अाहे, ज्याचे प्रवर्तन त्यांनी सारनाथ येथे केले, ज्याला धर्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात.


सर्व जीव सुखी होवोत.।
सर्वांना हिताचा मार्ग सापडो....

- पियुष खोब्रागडे..




सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

तुमचा बुध्द आणि आमचा बुध्द (?) (रिकाम्या डोक्यातील नव्या संकल्पना)

           भगवान बुद्धांची धर्मशिकवण जी बुद्धयान म्हणून जाणली जाते, तिचे विविध प्रकारचे अंग आहेत. श्रावकयान, बोधिसत्वयान, प्रत्येकबुद्धयान.. परंतु काही वर्षापासून ज्यांचा धर्माचा विशेष अभ्यासही नाही, असे लोक धर्माला जाणून घेण्याचा प्रयत्नही न करता किंवा त्यामध्ये विशेष ऋची न दाखविता आणि त्यांच्या बद्दल सत्य माहित नसताना, महायान आणि स्थावीरवाद यामध्ये फारक निर्माण करत होते. ज्यापैकी स्थाविरवाद हा बुद्धांचा खरं धर्म तर महायान हा ब्राह्मणांनी विकृत केलेला धर्म, ज्यामध्ये मूर्तीपूजा किंवा अन्य हिंदू पध्दतींनी अतिक्रमण केले होते. या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून स्थाविरवाडी परंपरेचा गौरव आणि तेवढाच महायानाचा अपप्रचार केला जायचा, ज्यामध्ये त्यांना सत्याची मुलभूत माहिती सुध्दा राहत नसायची. परंतु आजकाल ट्रेंड बदलला आहे, सद्यस्थितीत हा भेद स्थाविरवाद विरुध्द महायान असा राहिला नसून काही लोकांनी आपल्या मनातूनच ज्या एका नव्या पंथाची निर्मिती केलेली आहे, ज्याला ते भीमयान किंवा नवयान असे सुद्धा म्हणतात, त्यां नवयान विरुध्द महायान, स्थावीरवाद, वज्रयान किंवा इतर परंपरा यांच्याकडे तो वळविण्यात आलेला आहे. हे लोक मुल पारंपारिक बौध्द धर्म आणि बाबासाहेबांनी स्वीकारलेला बौध्द धर्म यांच्यामध्ये विनाकारण भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या अर्थानुसार बाबासाहेबांनी एका नव्या प्रकारच्या बौध्द धर्माची शिकवण दिली, जो केवळ स्वतंत्र्य, समता बंधुता, निरीश्वरवाद, कर्मकांड विरहिता इत्यादींची शिकवण देतो, जो समाधी नाकारतो, डोळे बंद असलेल्या बुध्दाला नाकारतो, पारंपारिक बौध्द धर्माला नाकारतो, इत्यादी त्यांचे म्हणणे असते. पण वास्तवात त्यांच्या आचरणातून यापैकी काही मुल्ये क्वचितच दिसतात, अशाप्रकारचे आरोप करीत असतांना ते कायमच द्वेषयुक्त चित्ताने बोलत असतात, कारण ते धर्माला अजूनही पूर्णपणे समजू शकलेले नाहीत, अर्धे ज्ञान घातक असते ते असेच.


          भारतातील एक विशिष्ट समाज जो भगवान बुध्दांना कायमच विष्णूचा अवतार म्हणून अपप्रचार करीत आलेला आहे, जो आटा बाबासाहेबांनी स्वीकारलेला बुद्ध हा मूळ बुध्द नसून त्यांनी स्वतः वेगळ्या विचारातून निर्माण केलेला बुध्द आहे, असा प्रचार सुध्दा करायला लागलेला आहे, त्यांच्यासाठी हे अंतर्गत वाद म्हणजे आयते कोलीतच म्हणावे लागेल. असा काही भेदांमुळे त्या अपप्रचार करणाऱ्या लोकांना तर मूळ बुध्द आणि बाबासाहेबांचा बुद्ध हे दोन्ही वेगळे आहेत आणि बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या बुध्दाचा मूळ बुद्धांशी आणि त्यांच्या शिकवनीशी जराही संबंध नाही, असा अपप्रचार करण्याची आयती संधीच आपण देत आहात. बौध्द धर्मातील विविध परंपरांना आणि त्यांच्या अस्तित्वांना समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण धर्माला जाणले पाहिजे.


बाबासाहेबांनी स्वीकारलेला धर्म आणि पारंपारिक धर्म यांच्यामध्ये भेद करण्यासाठी पूर्वी महायानाचा अपप्रचार केला गेला, कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता, त्यामध्ये हिंदू धर्माने आणि विशेषतः ब्राह्मणांनी आपल्या धार्मिक परंपरांची - देवी देवतांची कशाप्रकारे घुसखोरी केली, पालीला गरीब बनवून संस्कृत भाषेला कशाप्रकारे प्रकाशात आणले गेले, ति बौध्द धर्माची नसून हिंदू धर्माचीच शाखा आहे, हे सर्व आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे सामान्यजनांत पसराविल्या गेले, सामान्य लोक सुध्दा ह्या विषयावर केवळ विश्वास न ठेवता त्याचा प्रचार सुध्दा करत गेले, म्हणूनच सामान्यजणांत आज जगातील सर्वश्रेष्ठ अशा महायानाची प्रतिमा हि एक कर्मकांडावर आधारीत मार्ग अशीच बनलेली आहे, महायाना नंतर मोर्चा आता पारंपारिक स्थविरवादी मार्गाकडे वळविण्यात आला. यामध्ये स्थाविरवादी परंपरेतील अनेक गोष्टींचा काहीही संबंध नसतांना सुध्दा सुरुवातीला त्यांना महायानाशी जोडले गेले. जसे - विपश्यना, जातक सिद्धांत, इत्यादी . जेणे करून कोणत्याही अभ्यासाविना महायानाला विरोध करणारा वर्ग हा पारंपारिक बौध्द धर्माला सुध्दा विरोध करण्याकडे वळावा. कारण साधारणपणे धर्माचा अभ्यास करणाऱ्या साधकाला हि गोष्ट चांगल्या प्रकारे कळते कि, मूळ पारंपारिक विपश्यनेचा महायानाशी संबंच नसून भगवान बुध्दांनी त्यांच्या श्रावकांसाठी उपदेश केलेल्या श्रावकयानाशी संबंध आहे, ज्यामधील स्थाविरावाद हि शाखा आज अस्तित्वात आहे. पण विपश्यना हि महायांनी लोकांनी बौध्द धर्मात घुसडवली असा आरोप करणाऱ्या लोकांनी कदाचित धर्माचा बेसिक अभ्यास केला नसावा, म्हणूनच ते हा आरोप करीत असावेत असे वाटते.


          सुरुवातीला महायानाच्या बाबतील जनमानसांमध्ये संभ्रम पसरविण्यात यशस्वी ठरलेल्या कंपनीला आता मूळ पारंपारिक धर्माला वेगळे ठरविण्यासाठी त्यातील एकेक गोष्टींचा संबंध महायानासोबत लावावा लागत असून सर्व सामान्य लोकांच्या अचीकीत्सक वृत्तीमुळे ते काही प्रमाणात आपल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी सुध्दा होतांना दिसत आहेत. अशाप्रकारे बुध्दयानामध्ये भेद निर्माण करू पाहणाऱ्या लोकांसाठी मी माझ्या आगामी पुस्तकामध्ये "बुध्दयान" नावाचे एक स्वतंत्र प्रकारणच लिहिले आहे. पण येथे काही गोष्टी थोडक्यात सांगू इच्छितो :


१. भगवान बुद्धांच्या धर्मपरंपरे मध्ये निर्वाण प्राप्तीसाठी विविध प्रकारचे यान अस्तित्वात आहेत, जे आर्य अष्टांगिक मार्गावरूनच चालतात. महायान, श्रावाकायान इत्यादी जरी वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये अस्तित्वात असले तरी ते दुसऱ्या पंथांद्वारे आचरली जाणारी भगवान बुद्धांची शिकवण चुकीची आहे, म्हणून ते वेगळ्या स्वरूपांमध्ये अस्तित्वात नाहीत, तुमचा पंथ खोटा आणि आमचा पंथ खरं असे मनभेद सुध्दा त्यांच्यामध्ये अस्तित्वात नाहीत. परंतु अर्धवट अभ्यास केलेल्या आपल्यापैकी काहीना त्यांच्यामध्ये भांडण आहे, असा आविष्कार होतो आणि ते तसा प्रचार सुध्दा करू लागतात. परंतु वास्तवात मात्र तसे काहीही नाही. हे सर्व भगवान बुद्धांनी उपदेश केलेलेच धर्म असून निर्वाण नावाच्या शारामध्ये घेऊन जाणाऱ्या विईध यानांच्या स्वरूपामध्ये ते अस्तित्वात आहेत.


२. महायानाच्या बाबतीत जो काही अपप्रचार केला जातो, तो धांदात खोटा असून त्यावर इश्वास ठेवण्यापूर्वी आपण सर्वांनी त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. महायान हा symbolic स्वरूपाचा मार्ग आहे, त्याला समजून घेण्यापूर्वी आपण symbolism ला सुध्दा समजून घेतले पाहिजे. वरवर पाहता सामान्य जणांना तो कर्मकांडावर आधारित धर्माचे वाटतो. पण तसे आही, माझ्या मते तर तो जगातील सर्वात कर्मकांड विरहित श्रेष्ठ असा धर्म आहे, ज्यामध्ये प्रवेश सुध्दा केवळ एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कर्माकांडा द्वारे मिळत नाही, ज्यांना आपण बाप्तिस्मा, सुंता, दिक्षा असे म्हणतो. जेव्हा दुसरीकडे इतर धर्म आपल्याला आमच्या धर्मात प्रवेश करण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने देतात, तिथे महायान आपल्याला त्यामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी स्वतःची योयाता सिद्ध करायला सांगतो. हा मार्ग गुरु शिष्य परंपरेद्वारा चालतो, त्यामुळे येथे प्रवेश मिळविण्यासाठी आपल्या गुरूकडे एक प्रवेश परिक्षा द्यावी लागते - अर्थात बोधीचीत्ताची निर्मिती. बोधिचित्त हे महायानाचे प्रवेशद्वार आहे, तुमच्याकडे बोधिचित्त असेल तर आपान महायानावर आरूढ होण्यास सक्षम आहात, पण जर तुमचे बोधिचित्त नष्ट झाले तर तेव्हा मात्र तुम्ही ह्या मार्गावरून भ्रष्ट झालेले आहात. बोधिचित्त म्हणजे - सर्व जगाच्या कल्याणाकरिता मी बुद्धत्वाची प्राप्ती करेन, अशा प्रकारची अकृत्रिम अभिलाषा जेव्हा एखाद्या सामान्य चित्तामध्ये निर्माण होते, त्यां चित्ताला बोधिचित्त असे म्हणतात.


३. असाच काहीसा प्रकार आपल्याला भगवान बुद्धांच्या मुल पारंपारिक धर्माच्या बाबतीत होणारा अपप्रचार होतांना बघायला मिळतो, त्यामध्ये विपश्यनेसह, मूळ पाली तीपिटक ग्रंत हे संपूर्ण ब्राह्मणांनी केलेली भेसळ आहे, या निष्कर्षा पर्यंत येऊन पोहोचतात, अर्थात मग त्यांना स्वीकारण्याचा कोणता प्रश्नच येत नाही. याचा कदाची असाही अर्थ होऊ शकतो कि, मग बुद्धांची शिकवण सुध्दा अस्तित्वातच नाही, जे काही आहे ते ब्राह्मणांनी भेसळ केलेले. मग आधुनिक विश्वातील इतक्या विद्वानांनी बुद्धांना आणि त्यांच्या धर्माला जाणले ते त्यां भेसळयुक्त ग्रंथांना वाचूनच का.? कोणतीही गोष्ट जी आपल्या बुद्धीला पटली नाही, ती भेसळयुक्तच असली पाहिजे असा आजच्या तथा कथित उपासकांचा गैरसमज झालेला आहे, ते त्यां गोष्टीला भगवान बुद्धांच्या धर्माच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करीत नाहीत.


४. याच कंपनीतील विद्वान मंडळी सुध्दा विपश्यना हि बुद्धांची मूळ शिकवण म्हणून स्वीकार करायला तयारच नाहीत, त्यांना ग्रंथांचे दाखले दिले असता, ते सर्व भेसळ आहे म्हणून नाकारतात, तर काही लोक सर्व ग्रंथानाच नाकारून, ऐतिहासिक बुद्धांना नाकारून आपल्याच मनातील कथित कुऱ्हाड घेऊन चालणारा बुध्द प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी किंबहुना त्यांना बुध्दावा आणि बुद्धत्वाचा अर्थ सुध्दा नीट कळलेला नसतो. त्यांच्या अर्थानुसार डोळे बंद करून बोधिवृक्षाखाली बसलेला बुध्द हा ब्राह्मणनिर्मित असून, खरा बुध्द उघड्या डोळ्यानी कुऱ्हाड घेऊन जुलमी व्यवस्थे विरुध्द लढणारा आहे. पण बुद्धांनी  सांगितले आहे, "युध्दामध्ये सहस्त्र लोकांना जिंकण्यापेक्षा जो एक स्वतःला जिंकतो, तो खरं विजेता होय." अर्थात क्रोधाने, द्वेषाने, किंवा अनेक इतर कामनांनी इतरांना मारझोड करून आपण त्याच्यावर विजय प्राप्त करतो, अशा हजारो लोकांवर जरी आपण विजय प्राप्त केला तरी सुध्दा स्वतःवर - स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करणाऱ्याशी आपण कणभर सुध्दा बरोबरी करू शकत नाही. तुलनेत बाह्य युध्दामध्ये इतरांना मारझोड करून विजय प्राप्त करणे जास्त कठीण नाही, जेवढे स्वतःवर विजय प्राप्त करणे कठीण आहे. कारण येथे तुम्हाला तुमच्या स्वतःशीच युध्द करायचे असते, तुमच्याच मनातील वाईट विचारांना नष्ट करून, तुमच्या चित्ताची शुद्धी करून निर्वाण प्राप्त करण्याचा मार्ग हा बुध्दांनी सांगितलेला आहे. धम्म्पालन गाथा सुध्दा आपल्याला हेच सांगते, "कोणत्याही प्रकारचे पाप न करणे, कुशल धर्मांचे संपादन करणे, स्वःचित्ताची शुद्धी करणे, हेच बुद्धांचे शासन आहे." अशा चित्ताची शुद्धी करण्यासाठीच भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधीचा अभ्यास करायला सांगितले आहे. विपश्यना हे सुध्दा सम्यक समाधीचे अंग आहे, जे भटकणाऱ्या चित्ताला एकाग्र करून योग्य वळणावर लावते. त्यामुळे केवळ आह्य गोष्टींचा विचार करून, त्या गोष्टींना एकांगी दृष्टीकोनातून पाहून आपल्या अज्ञानापोटी केवळ विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा त्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा असे वाटते.



५. बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या बौध्द धर्माला मूळ पारंपारिक बौद्ध धर्मापासून वेगळे ठरविण्यासाठी केवळ महायान किंवा विपश्यना हे दोनच विषय नाहीत, इतरही अनेक आहेत, जसे जातक सिद्धांत वगैरे.. आपला विरोध दर्शविण्यासाठी आणि त्यां अनुषंगाने अपप्रचार करण्यासाठी हे लोक वेळ, काळ आणि परिस्थितीला समजून न घेता बाबासाहेबांनी म्हटलेल्या काही वाक्यांचे संदर्भ देत असतात, आणि त्यांना ह्या गोष्टी मुळी मान्यच नव्हत्या हे जाहीर करतात. काही प्रसंगामध्ये तर कोणत्याही प्रकारचा संदर्भ नसतांना सुध्दा ते याप्रमाणे प्रचार करतांना दिसतात _ जसे जातक कथा या ब्राह्मणांनी भेसळ केलेल्या आहेत, त्या खोट्या असून बाबासाहेबांनी नाकारल्या आहेत आणि आतां आपली जवाबदारी आहे कि, आपान सर्वांनी त्या नाकारल्या पाहिजेत. पण वास्तवात बाबासाहेबच जातक सिद्धांतांची स्तुती करतात किंबहुना ते तर जातक सिद्धांताला भगवान बुद्धांच्या जीवनाच्या जडणघडणी मधली सर्वश्रेष्ठ संकल्पना म्हणून स्वीकार करतात, ज्यावरच संपूर्ण महायान आधारित आहे, त्याला बाबासाहेबांनी कशाप्रकारे नाकारले असावे..? बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये कित्येक लेख त्यांनी महायांनी ग्रंथांच्या आधारावर लिहिले आहेत, विपश्यना आणि ध्यान हे बुद्धांच्या शिकवणीचे आणि मार्गाचे अंग आहेत हे त्यांनी आपल्या ग्रंठातीले कित्येक लेखांमधून सांगितले आहे, आपण एखाद्या गोष्टींचा विरोध करीत असतांना एकांगी अभ्यासावर न करता, इतर सर्व गोष्टींचा विचार सुध्दा करायला पाहिजे असे मला वाटते. अन्यथा बाबासाहेबांनी स्वीकारलेला बुध्द हा मुल पारंपारिक बुध्दापेक्षा वेगळा आहे, असे आपल्या अज्ञानामुळे अपप्रचार करीत राहिलो तर आपण तेच करत आहोत, जे शेकडो वर्षांपासून भगवानांच्या बाबतीत अपप्रचार करीत आले आहेत कि, ते विष्णूचे अवतार होते. शिवाय यां काळातही बाबासाहेबांनी बुद्धांना स्वीकारले नसून, त्यांनी स्वतःचा वेगळा इचार एका नव्या बुध्दाची निर्मिती करून त्यांच्याद्वारे मांडला, असा प्रचार सुध्दा आपल्याला त्यांच्याद्वारे होतांना दिसत आहे. म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून, धर्माचा स्वतः अनुभव करून, त्यातील सत्यता पडताळून पाहून त्या सर्वांचे हे प्रयत्न आपण हाणून पाडायला हवेत.


                                                                                - पियुष खोब्रागडे