शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुर शहरातील दीक्षाभुमीवर १४ ऑक्टोबर १९५६ साली विजयादशमीच्या मंगल दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह महास्थाविर चंद्रमणी यांच्याकडुन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. धम्मदीक्षेनंतर फार थोड्या कालावधीमध्येच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि स्वतःला बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी समजणाऱ्या प्रत्येकांनी आपापल्या सोयीचा आंबेडकरवाद निर्माण केला. काहींच्या मते देवधर्माला न मानने म्हणजे आंबेडकरवाद तर काहींच्या हिंदु धर्माला शिव्या देणे म्हणजे आंबेडकरवाद, इत्यादी इत्यादी.... अशाप्रकारेच या समाजाची वाटचाल सुरु आहे....


धम्मदीक्षेच्या इतक्या वर्षांनंतरही या समाजावर आपल्या जुन्या धर्माचा प्रभाव आहे तर काही टोकाचे नास्तीक बनले आहेत... त्यांच्या अशा वागणुकीमुळे इतर समाजातील लोकांचा बौद्ध धर्माकडे बघण्याचा दृष्टीकोनच अगदी बदलुन गेला आहे....



त्यांच्या अशा वागणुकींच्या मुळात त्यांच्यावर असलेल्या अजीत केसकंबलच्या पंथाचा प्रभाव आहे.





कोण आहे हा अजीत केसकंबल...? त्याचा आणि नव-बौद्धांच्या वागणुकीचा संबंध काय....?



अजीत केसकंबल हा बुद्धाचा समकालीन होता. (त्याचा उल्लेख सुत्तपिटकात, दिग्घनिकायाच्या श्रमणफल सुत्तामध्ये, तर The Buddha and His Dhamma च्या Book 1 Section 6 मध्ये आला आहे.) तो पुर्ण नास्तीक होता.


तत्कालीन ब्राह्मणव्यवस्थेचा तो अत्यंत आणि कडवा विरोधक होता.... त्याला ब्राह्मणांचे यज्ञ आवडत नव्हते, तर श्रमणांची तपश्चर्या सुद्धा त्याला मान्य नव्हती. एकुणच तो श्रमण आणि ब्राह्मण अशा दोघांचाही विरोधक होता. परंतु त्याला श्रमणच समजले जात असे. अजीत केसकंबल म्हणतो,,


अग्नीहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठन्म! बुद्धीपौरुषहीनांना जिविका धातृनिर्माता!!

अर्थ : अग्नीहोत्र, तीन वेद, त्रीदण्ड धारण करणे आणि भस्म लावणे, हे निर्मात्याने निर्मिलेली बुद्धीहीन आणि पौरुषतत्व हीन पुरुषांची उपजिविका आहे.


यावरुन त्याचा ब्राह्मण आणि वेदविरोध कळतो, तो उच्छेदवादी होता...


उच्छेदवादी म्हणजे,, त्याचा असा सिद्धांत होता कि,, चार महाभुतांपासुन आपले शरीर निर्माण झालेले आहे. त्याच्या कर्मफळावर विश्वास नव्हता, तो म्हणायाचा चांगल्या वा वाईट कर्माचे फळ मिळते हि अत्यंत चुकीची आणि खोटी गोष्ट आहे, आपले शरीर हे चार महाभुतांपासुन बनलेले आहे मेल्यानंतर ते सर्व तत्त्व निसर्गात विलीन होतात. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म इत्यादी कल्पना - संकल्पना खोट्या आहेत. दानाची प्रशंसा मुर्ख करतात. असा हा नास्तिक अजीत केसकंबल आजच्या आधुनीक युगातील नास्तिकांचा किंवा फेसबुकवर धर्माला अफुची गोळी समजणाऱ्या, फेसबुकवर येशू ख्रिस्तांवर अश्लाघ्य टीका करणाऱ्या नास्तीकांचे गॉडफादर किंवा शास्ताच आहेत....


अशा या अजीत केसकंबलाचा पुनर्जन्मावर वा कर्मफळावर विश्वास नसल्यामुळे खा प्या मजा करा हा त्याचा सिद्धांत होता, सदाचाराला त्याच्या धर्मामध्ये जागा नव्हती.. त्याचा अर्थ दुराचाराला जागा होती असाही नव्हे...


आता अजीत केसकंबल आणि नव-बौद्धांच्या (बामसेफी वृत्तीच्या) धर्मामध्ये तुलना केली असता दोघांचा धर्म जवळपास सारखाच आहे असा आभास होतो.



डॉ. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या प्रसंगी आपल्या सविस्तर भाषणामध्ये म्हटले होते. सदाचारी बना, तुमचे आचरण शुद्ध असायला हवे, बुद्धाच्या धर्मानुसार आचरण करा, बुद्धाच्या धर्माविरुद्ध वागु नका नाहीतर लोक म्हणतील, 'महारांनी एवढा चांगला बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याला बाटवला' अशी पाळी तुमच्यावर येता कामा नये. परंतु त्यांच्यावरील वाढत चाललेल्या अजीत केसकंबलच्या प्रभावामुळे हे खरे होताना दिसत आहे.




बुद्ध हे नास्तिक नव्हते....



भगवान बुद्ध जरी निरिश्वरवादी असले तरी ते नास्तिक नव्हते, त्यांचा ईश्वरावर विश्वास नाही परंतु धर्मावर विश्वास आहे, कर्मावर विश्वास आहे, पुनर्जन्मावर विश्वास आहे. मोक्षावर (निर्वाण!) विश्वास आहे. हा अंधविश्वास नव्हे, हे सर्व सम्यक संबुद्धाचे अनुभव आहेत. कोणीही ज्याचा स्वतः अनुभव घ्यावा...


परंतु हे नवबौद्ध भगवान बुद्धांचे मुळ सिद्धांत आणि शिकवणीला पायदळी तुडवुन, सदाचाराची सीमा ओलांडुन दुसऱ्या धर्मावर, दुसऱ्यांच्या श्रद्धांवर अश्लाघ्य टीका करत असतात, हाच त्यांचा खरा धर्म बनलेला आहे, (ज्याचा संस्थापक अजीत केसकंबल होता..) अशा सर्वांनी स्वतःला बुद्धाचा शिष्य आहे असे सांगु नये....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्धाचा धर्म म्हणजे नीति . बौद्ध धर्मात देवाची जागा नीतिने घेतली आहे. बौद्ध धर्मामध्ये ईश्वराला महत्त्व नाही, तो निरिश्वरवादी आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे कि तो तुम्हाला अस्तित्व नसलेल्या ईश्वराला शिविगाळ करण्याची परवानगी देतो... भगवान बुद्ध आपल्याला निर्वाणप्राप्तीचा मध्यम मार्ग सांगतात. त्याला तुमच्याकडुन गौरव नको आहे, तुम्ही सदाचारी बनावे हिच त्याची अपेक्षा आहे. कोणत्या धर्माला शिविगाळ करण्यापेक्षा आपण निर्वाणप्राप्तीचे ध्येय समोर ठेऊन, मध्यम मार्गावरुन चालण्याचा प्रयत्न करावा हाच बुद्धाचा धर्म आहे.



इतर धर्मीयांवर टिका करणारे बामसेफी नवबौद्ध हे बौद्ध धर्मीय नसतात. मुळतः ते नास्तीक असल्या कारणाने त्यांच्या जीवनाचे कोणतेही ध्येय नसते त्यामुळे ते विशिष्ट समाजाला टारगेट करत असतात. आणि हाच बुद्धाचा धर्म असल्याचा प्रचार करत असतात आणि बुद्धाच्या सदाचारावरील प्रवचनांची उदाहरणे दिली असता भटांनी भेसळ केली असे सांगतात आणि The Buddha & His Dhamma मधील संदर्भ दिले असता भटांनी प्रकाशीत केलेल्या पुस्तकातील संदर्भ देऊ नकोस असे सांगतात, तेव्हा यांच्या मनोवृत्तीची खरच खुप कीव येते, अशा असुरांना आणि मारांना निर्वाण प्राप्तीसाठी आणखी किती जन्म घ्यावे लागणार याचा विचार येतो...


काही जण म्हणतात डॉ. बाबासाहेबांनी त्रिपिटक नाकारला., मग स्वीकारला काय...? त्रिपिटक नाकारणे म्हणजे बुद्धाचा धर्मच नाकारणे होते. काही लोक समजतात तसा बाबासाहेबांनी दीक्षा दिलेला बौद्ध धर्म मुळ बौद्ध धर्मापेक्षा जराही वेगळा नाही आहे. डॉ. बाबासाहेबांनी थेरवादी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. (आपण चर्चा करु शकतो)




वाईट प्रथांचा विरोध करणे बुद्धाच्या धर्माच्या विरोधी आहे का....?



नाही..! वाईट प्रथा, परंपरा यांचा विरोध करावा. परंतु नैतिकतेच्या चौकटीत राहुन, सदाचाराच्या कक्षेत राहुनच... परंतु एखाद्या विशिष्ट समाजावर, जातीवर, धर्मावर सातत्याने गरळ ओकणे, शिविगाळ करणे, एखादा विशिष्ट समाजाचे असल्याने एखाद्या व्यक्तीचा द्वेष करणे हा सिद्धांत कोणता बौद्ध धर्म सांगतो....? (असे तर अजीत केसकंबल सुद्धा सांगत नाही...)


बुद्धाने नव्हता केला का, जातीसंस्थेचा विरोध, यज्ञसंस्थेचा विरोध, जन्माधारीत व्यवस्थेच विरोध....? केला होता ना पण सदाचाराच्या, नैतिकतेच्या चौकटीत राहुनच....


आपल्या बौद्ध बांधवांना बामसेफी मार्गावरुन परत सम्यक संबुद्धाच्या निर्वाण प्राप्तीच्या, सदाचारी मार्गावर आणने व योग्य धर्माचा ज्ञान देणे हाच त्याच्यावर उपाय आहे....


सुचना : बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या मंडळींना बौद्ध म्हणुनच संबोधले पाहिजे. बौद्ध धम्मात नवबौद्ध असा वेगळा पोटभेद किंवा वेगळी जमात नाही. बौद्ध धम्मेय म्हटला की तो सर्व एकच होय. बौद्धांत नवा बौद्ध आणि जुना बौद्ध असा प्रकारच नाही. बौद्ध तेवढे सारे एका बौद्ध नावानेच ओळखले जातात, अशी वस्तुस्थिती आहे, त्यामुळे विद्वाण, जाणते यांनी भारतीय नव-दीक्षित बौद्धांना नव-बौद्ध म्हणणे सर्वस्वी चुक आहे. या समाजाला बौद्ध असेच म्हटले पाहिजे.


या लेखामध्ये नवबौद्ध हा शब्द नवदीक्षीत बौद्ध किंवा आंबेडकरी समाजाबद्दल वापरण्यात आला नसुन स्वतःला बौद्ध समजणाऱ्या बामसेफी लोकांबद्दल वापरण्यात आला आहे...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...