ह्या लेखामध्ये मागील लेखातील आक्षेपांना तसेच त्या लेखावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. लेखाची लांबी थोडी मोठी आहे, परंतु आपण सर्वांनी तो अवश्य वाचावा ही विनंती...
दोन दिवसांच्या पूर्वी मी बौध्द धम्माच्या बाबतीत अपप्रचार
करत सोशल मिडीयावर फिरणाऱ्या पोस्टला मी समर्पक उत्तरे दिलेली होती, आज ह्या
लेखामध्ये आणखी वेगळ्या मार्गाने त्या लेखाचे खंडन करणार आहे. लेखकाने त्यांच्या
लेखामध्ये मांडलेल्या विचारांचे खंडन मी बौध्द मताच्या द्वारे करू शकत नव्हतो,
अशातला भाग नव्हता. पण माझ्याद्वारे त्या पध्दतीने उत्तर्दिले असते तर अनेकांनी
प्रश्न व शंका उपस्थित केल्या असत्या, तसेच काही लोक तर थेट त्या निष्कर्षापर्यंत
पोहोचले असते की, हे मत अशुध्द आहे, भेसळ झालेले आहे, त्यामुळे उपस्थित केल्या
गेलेल्या मुद्द्यांचे खंडन करण्यासाठी मी बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथातील
संदर्भ दिले, जेणेकरून त्यांच्यासाठी त्यांचा स्वीकार करणे सोयीचे जावे. परंतु
काहींच्या म्हणण्यानुसार बुध्द आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ बाबासाहेबांच्या
निर्वाणानंतर प्रकाशित झाले असल्यामुळे त्यामध्येही भेसळ झाल्या असल्याची शंका
नाकारता येत नाही, त्यामुळे ह्या लेखामध्ये मी त्यांनी मांडलेल्या मुद्यांचे बौध्द
मतांच्या अनुसार खंडन करीत आहे..
याला मुख्य
कारण म्हणजे सदर लेखाच्या समर्थनासाठी उतरलेल्या लोकांनी त्या लेखाचे समर्थन करतांना
बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथातील संदर्भ नाकारून जे काही संदर्भ दिले,
त्यांचा जराही संबंध येत नाही. त्यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या संदर्भांना
बघितल्यावर असे समजते की, त्यांचा विरोध हा अत्यंत गैरसमजुतीतून निर्माण झालेला
आहे, आणि ह्या गैरसमजुतींना नष्ट करण्यासाठी भगवान बुद्धांनी उपदेश केलेल्या
सिध्दांताला योग्य प्रकारे समजून घेता आले पाहिजे. त्यामुळेच हा लेखन प्रपंच करावा
लागत आहे.
लेखकाने बौध्द धम्माच्या बाबतीत जे काही आक्षेप घेतले होते,
ते पुढील प्रमाणे :
१. बोधिसत्व, जातक कथा, बुध्दवंश यांच्यासारख्या थोतांड
कल्पना आणल्या गेल्या आहेत.
२. बुद्धांचा जन्म दाखवितांना बोधिसत्व सुमेध स्वप्नात
आल्याचा प्रचार केला गेला, अशांना कसे माहित झाले कि, सुमेध हा बोधिसत्व होता..?
३. अनेक बुद्धांची संकल्पना आणली तेव्हाच सुमेअधाला जन्माला
घालण्याचे जाणवते.
४. शेतकरी सम्राट ज्योतिषांना कसा काय बोलावू शकेल..? कारण
शुद्धोधन हा अंधश्रद्धाळू नसल्याची त्यांना नोंद मिळते.
५. सात पावलांचा दृष्टांत आणि आकाशातून देवांच्या पुष्पवृष्टीचा दृष्टांत
६. ईश्वर व आत्मा ह्या गोष्टी काल्पनिक आहेत.
७. बुध्दाला हिंदू धर्माशी संबंध दर्शविण्यासाठी त्यांच्या
चरित्रामध्ये :
अ. ब्रह्म सहम्पातीच्या रूपाने हिंदुंच्या त्रिमूर्ती मधील
ब्रह्म घुसविण्यात आला.
ब. इंद्र बुद्धांचे गुणगान गातांना दिसत आहे.
क. बुध्दाला अर्हंत म्हणून स्तुती केल्यामुळे लेखकाने
त्याच्यावर स्वतःच भ्रमित असल्याचा आरोप केला आहे.
ड. या सर्वांच्या द्वारे भगवान बुद्धांना हिंदू धर्माकडे
नेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.
इ. सम्यक सम्बुध्द बनण्याच्या पूर्वी आपण सामान्य मानव आहोत
हे सांगितल्यावर सुध्दा बुध्दांना अलौकिक दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ई. कोणत्याच गोष्टीची समीक्षा न करता, त्या स्वीकारण्याची
आपल्या समाजामध्ये परंपरा आहे.
फ. महायांनी लोकांनी पूजाविधी बौध्द धाम्मामध्ये आणला.
८. बाबासाहेबांनी
श्रीलंकेत जाऊन शुध्द स्वरूपामध्ये बौध्द धम्म आणला.
९. हीनयान आणि महायान यांनी स्वठ्ला श्रेष्ठ सिद्ध
करण्यासाठी बुद्धांना चमत्कारिक बनविण्याची स्पर्धाच सुरु केली. यातूनच जातक कथा
निर्मिती करण्यात आली.
१०. कर्म आणि पुनर्जन्म यांच्या विषयी उडालेला गोंधळ :
अ. बुद्धांनी सांगितलेला पुनर्जन्माचा सिध्दांत.
ब. पंचमहाभुतांच्या द्वारे पुनर्जन्म होतो, नवीन चेतना
निर्माण होते.
क. इतर धर्मांच्या तुलनेत आपला धर्म मागे राहता कामा नये
यासाठी चमत्कार घुसविण्यात आले आहेत.
ड. लेण्यांच्या मध्ये बाबासाहेबांनी दिलेलाच बुध्द सापडेल
जो स्वीकारायला सोपा असणारा धम्म आहे..
वरील लेखामध्ये मांडलेल्या मुद्यांचे खंडन करण्यासाठी मी
बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथातील संदर्भ दिलेले होते. त्याविरुध्द वरील
मुद्यांचे समर्थन करण्यासाठी समर्थकांनी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले (मी मागील लेखामध्ये मांडलेल्या मुद्यांना समजून घेण्यासाठी तो लेख वाचून घ्यावा = बौध्द धम्माच्या बाबतीत पसरविण्यात येणारे गैरसमज : भाग ४)
वरील मुद्यांचे खंडन केल्यानंतर त्या लेखकाच्या समर्थकांनी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले :
१. बिदेशातील बौद्ध धम्म हा विपश्यना व अभिधम्म यावर
आधारित आहे. अशाप्रकारचा बौध्द धम्म भारतीय लोकांसाठी अत्यंत घातक आहे.
२. बुध्दांनी आपल्या धाम्मामध्ये स्वतःचे असे कोणतेही विशेष
स्थान राखले नाही. तो मनुष्य पुत्र म्हणून जन्मला आणि धम्माचा उपदेश सुध्दा
सामान्य मानव म्हणूनच केला. त्यांनी कधीही दैवी असल्याचा दावा केलेला नाही.
३. बाबासाहेब म्हणतात किम बुध्द हा सामान्य मानव होता. मग
बुध्द आणि त्यांच्या ह्या ग्रंथामध्ये ते बुद्धांना चमत्कारिक कसे घोषित करतील..?
४. बुद्धांनी जे उपदेश केले आहेत, जो धम्म शिकविला आहे, जर
तो तुमच्या "तर्क व अनुभव यांच्यापेक्षा भिन्न वाटला तर केवळ त्यांनी उपदेश
केलेला आहे, म्हणून तो त स्वीकारावा हे बंधनकारक नाही. परंतु तुम्ही तुमच्या तर्क
व अनुभूतीच्या स्तरावर जो काही धम्म जाणला त्याला modify करण्यासाठी तुम्ही मुक्त
आहात.
५. बाबासाहेब म्हणतात, बुध्द हे भारतातील प्रथम क्रांतिकारक
पुरुष होते.
६. बाबासाहेबांना काही बदल घडवायचे होते :
अ. बौध्द
धर्मग्रंथ बनविणे
ब. भिक्खू
संघाच्या एम्स आणि ओब्जेक्टीव तयार करणे.
क. जागतिक
बौध्द मिशन तयार करणे.
७. बाबासाहेबांनी भारतीय धम्मपद नाकारले व त्याऐवजी चीनी
धम्मपद स्वीकारले. कारण भारतीय धम्म्पदामध्ये दैव वाद आहे..
याचा अर्थ
असा होतो की, बाबासाहेबांना खूप सारे बदल करायचे राहून गेले होते. आम्हा
विद्वानांना या गोष्टीचे वेळेत आकलन होणे गरजेचे आहे, नाहीतर बौध्द धम्मात हिंदू
धर्माचा शिरकाव होऊन बौध्द धम्म भ्रष्ट होईल यात शंका नाही..
-
समर्थक
वरील
लेखाचे समर्थन करणाऱ्या लोकांनी मी उपस्थित केलेल्या मुद्यांचे स्पष्टपणे खंडन करू
शकणारे संदर्भ दिलेले नाहीत किंवा ते अपप्रचार करणाऱ्या लेखकाच्या लेखाला प्रबळ
समर्थन प्रदान करू शकतील असेही काही विशेष त्यांच्या संदर्भामध्ये दिसत नाहीत.
वरील मुद्यांचे स्पष्टपणे खंडन करता न आल्यामुळे त्यांनी त्याद्वारे केवळ हे
सांगितले आहे की, बाबासाहेबांनी "ABCDE" पूर्वी म्हटले होते, त्यामुळे
ते नंतर "UVWXYZ" म्हणू शकणार नाहीत. समर्थकांनी त्यांच्या पत्रामध्ये
बाबासाहेबांच्या द्वारे वापरल्या गेलेल्या अशा संदर्भांना सादर केलेले आहे, ज्याचा
लेखामध्ये घेतलेल्या मुद्याशी सरळ संबंध येत नाही. तर धम्माचे योग्यप्रकारे आकलन न
करता आल्यामुळे त्याचा अप्रत्यक्षरित्या तरी संबंध असेल असे त्यांना वाटते, पण तसे
नाही. त्यामुळे ह्या लेखामध्ये मी दोघांच्याही द्वारे मांडल्या गेलेल्या मुद्यांचे
खंडन करणार आहे..
१. "लेखक सर्बाप्रथम म्हणतात की बोधिसत्व, जातक
कथा, बुध्दवंश यांच्यासारख्या थोतांड कल्पना बौध्द धर्मात आणल्या गेल्या
आहेत." लेखक हा आरोप कोणत्या आधाराव करत आहेत, हे कळायला मार्ग नाही.
माझ्या मतानुसार ह्या सर्व संकल्पना थोतांड असल्याची कल्पना हि त्यांच्या पोकळ
तर्कावर आधारित असावी. मनुष्य हा मर्यादित इंद्रिय क्षमता असलेला जीव आहे,
त्याच्या सर्व इंद्रियांच्या क्षमता मर्यादितच आहेत. एका विशिष्ट मर्यादेच्या
पलीकडे ते कार्य करू शकता नाहीत. यामध्ये त्याची विचार करण्याची क्षमता सुध्दा
आली. जगामध्ये ज्यांचे संशोधन व्हायचे आहेत असे इतके सत्य अस्तित्वात आहेत. जर
तुमची विचार करण्याची (तर्क) क्षमता त्यांच्या पर्यंत पोहोचू शकत नसेल, याचा अर्थ
ते अस्तित्वात नाहीत किंवा ते असत्य आहेत - अशी मान्यता तयार करण्यास काहीही अर्थ
नाही..
बोधिसत्व
आदर्श हि अत्यंत उत्कृष्ट अशी संकल्पना आहे, बोधीसत्वत्व हे स्वःत्यागाचे,
नैष्कर्म्याचे, खोल अंतर्दृष्टीचे, उर्जेचे, सहनशीलतेचे, सत्यत्वाचे, अधिष्ठानाचे,
अमर्याद प्रेमाचे आणि परिपूर्ण मानसिक सामातोलाचे एक प्रात्यक्षिक आहे. बोधिसत्व
सर्व जगाच्या कल्याणासाठी सम्यक संबोधीची प्राप्ती करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा
त्याग करतो. बोधिसत्व तुमच्यासाठी जे काही करतो ते तुमचे माता आणि पिता किंवा कोणी
देव आणि संत तरी करतात काय..? ज्या लोकांनी (केवळ स्वतःच्या कल्याणाचीच) वृत्ती
त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये सुध्दा जोपासलेली नसेल, ते इतरांच्या कल्याणाचा
विचार काय करतील..? सर्व जीवांच्या काल्याचे ध्येय तर सोडाच, याप्रकारे स्वतःच्या
कल्याणाचे ध्येय निर्माण करणारे असामान्य रत्न जिथे अनेकांच्या मनात निर्माण होत
नाही - अगदी स्वप्नामध्ये सुध्दा., तिथे बोधिसत्व ह्या सर्वांचे प्रात्यक्षिक
करतो.
बोधीसत्व
आदर्शाला थोडक्यात समजून घेण्यासाठी कृपया आपण किमान बोधिसत्वांच्या प्रार्थना
अवश्य वाचाव्यात. तसेच पुढील लेख पूर्णपणे चांगल्या प्रकारे वाचून त्यांचे
योग्यप्रकारे आकलन करण्याचा प्रयत्न करावा..
२. अनेक बुध्दांची संकल्पना नंतर जन्माला आली असे नाही.
सम्राट अशोकांच्या काळामध्ये सुध्दा ह्या संकल्पनेला मान्यता होती. राज्याभिषेकाच्या
१४ वर्षांच्या नंतर सम्राटांनी निगली सागर येथे भगवान कोणागमन यांच्या स्तुपांची
पुनर्बांधणी केली आणि पूजेसाठी शिल्प स्तंभ तयार केले. त्यामुळे ही संकल्पना नंतर
जन्माला घालण्याचा प्रश्न निकालामध्ये निघतो. भगवान बुध्द हे काही कोणत्या
ईश्वराचे पुत्र, त्याचे अवतार किंवा देवदूत नव्हते. तर आपल्या सारखेच सामान्य
मानवाचे पुत्र होते, ज्यांनी मानव म्हणूनच जन्म घेतला होता. पण आपल्या धर्मबलाच्या
सहाय्य्याने त्यांनी मनुष्याच्या विकासाची सर्वोच्च अवस्था प्राप्त केली होती., जी
तथाकथित देवांच्या पेक्षा श्रेष्ठ होती. आणि त्यांचा असा दावा आहे कि, जगातील
प्रत्येक जीवाकडे बुद्धांचा स्वभाव असतो. प्रत्येक जिवामध्ये बुद्धत्व प्राप्त
करण्याची क्षमता आहे. तुम्ही - आम्ही कोणीही बुध्दत्वाची प्राप्ती करू शकतो. त्यामुळे
ह्या जगामध्ये जितके जीव आहेत, तितके बुध्द निर्माण होऊ शकतात. म्हणून हि संकल्पना
चुकीची किंवा अंधश्रद्धा पसरविणारी आहे असे समजण्याचे काही कारण नाही.
३. लेखक असे म्हणतो कि, शेतकरी (अर्थात गरीब..?) असलेला
शुद्धोधन राजा हा अंधश्रध्दाळू नसल्याची लेखकाला कोणत्या संदर्भामध्ये नोंद मिळते
हे मला माहित नाही. स्वतः बाबासाहेबांनी बुध्द आणि त्यांचा ह्या ग्रंथामध्ये
लिहिल्या प्रमाणे शुद्धोधन हा राजा अतिशय श्रीमंत होता, त्याच्या शेतामध्ये हजार
नांगर चालत असत. त्याने स्वप्नांचे अर्थ सांगणाऱ्या ब्राह्मणांना बोलाविले होते. (याचा अर्थ असा होतो की, महामायेला सुमेध बोधीसत्वाचे
स्वप्न पडलेले होते, हे येथे लक्षात घ्या), व नंतर त्याच ब्राह्मणांच्या
खांद्यावर सिध्दार्थाच्या अभ्यासाची जवाबदारी देण्यात आलेली होती, ज्यामध्ये
त्याने भाषाशास्त्र, व्याकरण शास्त्र, वेद, वेदांगे, उपनिषदे यांना आत्मसात केले
तसेच आलार कालामाचा शिष्य भारद्वाज याच्याकडून ध्यानधारणेची शिकवण सुध्दा आत्मसात
केली.
४. सात पावलक़न्चा दृष्टांत तसेच आकाशातून देवांच्या
पुष्पवृष्टीचा दृष्टांत या विषयावर आपण मागील लेखामध्ये चर्चा केलेली आहे. लेखाची
लांबी जास्त न वाढावी यासाठी त्यांचा उल्लेख येथे टाळतो. या विषयांना समजून
घेण्यासाठी आपण मागील लेख वाचून घ्यावा, जर काही समजले नसेल तर आपण प्रश्न विचारू
शकता.
५. ईश्वर आणि आत्मा ह्या गोष्टी काल्पनिकच आहेत. जगातील
कोणत्याही स्वरूपातील बौध्द धम्म ह्या कल्पनांवर विश्वास ठेवीत नाहीत. व्यक्तीच्या
जीवनामध्ये, त्याच्या जडण घडणी मध्ये ह्या दोन्ही संकल्पनाचे काहीही विशेष कार्य
नाही. शिवाय यांच्यावर चर्चा करणेच व्यर्थ आहे असे भगवान बुध्द म्हणतात.
६. लेखक पुढे असा आरोप करतो कि, बुध्दाचा हिंदू धर्माशी
संबध दर्शविण्यासाठी त्यांच्या चरित्रामध्ये अनेक गोष्टी घुसविण्यात आल्या आहेत.
वास्तवात लेखकाला बौध्द धम्माचे योग्यप्रकारे आकलन झाले नसल्याने, तो अशा प्रकारचा
आरोप करीत आहे असे समजते. हिंदू आणि बौध्द ह्या दोन्ही परंपरांचा उगम ह्या एकाच
देशामध्ये आणि प्रदेशामध्ये झाला तसेच त्यांची वृद्धी सुध्दा. त्यामुळे दोन्ही
परंपरामध्ये अनेक सारखे शब्द आलेले आहेत, ह्याचा अर्थ त्यांचा अर्थ दोन्ही
परंपरांमध्ये समानच घेतला जातो असे काही नाही. बौध्द परंपरेतील अनेक शब्द जे हिंदू
धर्मातील शब्दांशी साधर्म्य साधतात त्यांचा बौध्द परंपरेतील अर्थ घेण्याचे सोडून
हिंदू धर्मातील अर्थ घेतल्यामुळे अनेक प्रकारे गैरसमज होतो कि, बौध्द धम्मामध्ये
हिंदू पध्दती घुसडविण्याचा प्रयत्न केला आहे.
अ. भगवान बुद्धांची वंदना करायला आलेला ब्रह्म सह्म्पती हा
हिंदूंच्या अर्थानुसार जगाची निर्मिती करणारा ईश्वर नव्हे तर तो भगवान बुद्धांच्या
पेक्षा अत्यंत खालची मानसिक अवस्था असणारा जीव आहे. त्याला सुध्दा मुक्तीसाठी -
निर्वाणाच्या प्राप्तीसाठी भगवान बुद्धांच्या धम्म उपदेशाची गरज आहे. भगवान बुध्द
उपदेश करीत नाही आहेत, हे पाहून ब्रह्म सहम्पती व्यथित होतो की, ह्या जगामध्ये
बुद्धांचे अस्तित्व आधीच इतके दुर्मिळ आहे आणि ह्या जीवाला बुद्धत्वाची प्राप्ती
झाली तरी सुध्दा त्याचे धम्मचक्र प्रवर्तन करण्याची इच्छा मात्र मुळीच दिसत नाही
त्यामुळे जर बुद्धांनी उपदेश केला नाही तर
सर्व जग ह्या अमृताला मुकेल.
ब. शक्र (ज्याला वैदिक परंपरेमध्ये इंद्र म्हटले गेले आहे)
सुध्दा स्वतःच्या कल्याणाची कामना करणारा सामान्य जीव आहे. तो सुध्दा दुःखाच्या बंधनामध्ये अडकलेला
जीव आहे, आणि त्यापासून मुक्तीसाठी त्याला सुध्दा भगवान बुद्धांच्या धम्माची
आवश्यकता आहे. अगदी आपल्याप्रमाणे तो सुध्दा भगवान बुद्धांना त्याचा गुरु मानतो
आणि त्यांच्या गुणांची स्तुती करतो. सत्था देव मनुस्सान बुद्धो भगवा ति - भगवान
बुध्द सर्व देव आणि मनुष्यांचे शास्ते (गुरु) आहेत.
क. लेखक वरील उदाहरणांच्या आधारे असा आरोप करतो की, या
सर्वांच्या द्वारे भगवान बुद्धाना हिंदू धर्माकडे नेण्याचा प्रयत्न केला गेलेला
आहे. त्याला मी परत एकदा सांगू इच्छितो की, वरील उदाहरणामध्ये सांगितलेल्या ब्रह्म
सहम्पती आणि शक्राचा हिंदू धर्मातील सृष्टीनिर्माता ब्रह्म आणि देवांचा राजा इंद्र
यांच्याशी जराही संबंध नाही. भारतीय परंपरेतील प्रचलित शब्दांमुळे हे शब्द
साधर्म्य उदयास आले. आणि धम्माला योग्यप्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न न
केल्यामुळे तसेच आपल्या सामान्य व अल्पविकसित मर्यादित बुद्धीची मर्यादा न ओळखून
त्याला ज्या गोष्टी पटत नाही त्यांची सामिक्षा न करता त्याला नाकारल्या मुळे हा
गोंधळ उडालेला आहे. जर लेखकाला असे वाटत असेल की, वरील उदाहरणा मधील इंद्र व ब्रह
ह्यांचा हिंदू धर्माशी सरळ संबंध आहे तरी त्यांच्या मनामध्ये असा सहज विचार येऊ
शकला नाही की, सामान्य मानव म्हणून जन्म घेतलेल्या भगवान बुद्धांनी आपल्या
प्रयत्नाने अशी अवस्था प्राप्त करून घेतली की, ज्यांना अंधविश्वासी लोक पूजतात ते
सुध्दा भगवान बुद्धांची वंदना करतात, अर्थात त्यांच्यापेक्षा सुध्दा उच्च अवस्था
प्राप्त केली आहे. येथे बुद्धांना अलौकिक दाखविले नाही, तर सामान्य मानवाचे आणि
त्याच्या मनाच्या क्षमतांचे वर्णन केले आहे. असा सामान्य मानव जो आपल्या
अंधविश्वासू पणामुळे (अर्थात कच्च्या व अपरिपक्व मनामुळे) तथाकथित देवांची पूजा
करतो त्याने जर प्रयत्न केला तर (ह्या मनाच्या सहाय्यानेच) तो अशा सर्वोच्च
अवस्थेला प्राप्त करू शकतो जिथे तो देव व मनुष्यांच्या द्वारे पूजिला जातो.
ड. लेखक पुढे म्हणतात, कोणत्याच गोष्टीची समीक्षा न करता
त्या स्वीकारण्याची आपल्या समाजामध्ये परंपरा आहे. पण लेखक पुढे हे सांगायला विसरतात
की, कोणत्याच गोष्टींची समिक्षा न करता, त्यांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न न करता
त्या नाकारण्याची सुध्दा प्रथा उदयास येत आहे. ह्या गोष्टीकडे आपले लक्ष केंद्रित
करावे.
७. लेखक पुढे म्हणतात की, महायांनी लोकांनी पूजाविधी बौध्द
धम्मामध्ये आणला. त्यांना मी सांगू इच्छितो की, श्रेष्ठ जीवांचा आदर सत्कार
करण्याची प्रथा श्रावकयानापासूनच चालत आलेली होती. एकदा भगवान बुध्द आपल्या
शिष्यांना एका प्रदेशामध्ये विहार करणाऱ्या पच्चेक बुध्दांना वंदन करायला सांगतात.
तर बहुपरीचीत महामंगल सुत्तामध्ये भगवान एका देवाला मंगल धर्मांचा उपदेश करतांना
सांगतात, पूजा च पुजानियान एतं मंगल मुत्तमं - अर्थात पूज्यनीय लोकांची पूजा करणे
हेच उत्तम मंगल आहे. अर्थात पूजा हा प्रकार मूळ बौध्द धम्माचे अविभाज्य अंग आहे.
आपण
महायानाच्या पुजा आणि प्रार्थना विधींची तुलना अन्य कोणत्याही परंपरेतील पूजा
विधीसोबत करू शकत नाही. अन्य परंपरेतील गोष्ट तर वेगळीच - जिथे लोक आपल्या मंगल
कामनेसाठी अनेक अनैतिक मार्गांच्या द्वारे इष्ट देवतांना खुश करण्यासाठी अनेक
प्रकारच्या कर्मकांडाना शरण जातात, त्यामुळे ती कोणत्याही अर्थाने नैतिक पूजा ठरत
नाही. तर श्रावकयान परंपरेमध्ये जी काही पूजा केली जाते, ते धम्माच्या मार्गावर
चालतांना आपले चित्त सुदृढ रहावे म्हणून. त्याद्वारे धम्म आचरणाची प्रेरणा मिळावी
म्हणून, कारण धम्मच कल्याणकर्ता आहे आणि तो कोणत्याही भूलथापांना बळी पडत नाही, तर
तो केवळ त्याचे आचरण करणाऱ्या जीवांचे कल्याण करण्यासाठी प्रतीबध्द आहे. तर
महायानातील पूजा विधी हा त्या व्यक्तीच्या स्वतःच्या कल्याणासाठी नाही, तर संपूर्ण
जगासाठी आणि जगातील सर्वच जीवांच्या कल्याणासाठी त्याने बुध्दत्वाची प्राप्ती
करावी व त्यासाठी त्याच्या मनाला सतत प्रेरणा मिळत रहावी यासाठी त्या परंपरेमध्ये
पूजा विधीला महत्व आहे. महायानाच्या प्रार्थनांमध्ये नेमके काय असते हे न जाणताच
अशा प्रकारचा आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. महायानावर आरूढ जीव किती महान असतो
याची प्रचीती साध्या त्याच्या द्वारे केल्या जाणाऱ्या प्रार्थनांच्या सहाय्याने
सुध्दा होऊ शकते.
८. लेखक पुढे असे म्हणतात की, बाबासाहेबांनी श्रीलंकेत जाऊन
शुध्द स्वरूपामध्ये बौध्द धम्म भारतामध्ये आणला. यावरून त्यांना सांगायचे आहे कि,
पूर्वी बौध्द धम्म हा विकृत झालेल्या अवस्थेमध्ये होता, त्यामध्ये पूजा होत्या,
ब्रह्म - इंद्र होते, भविष्य सांगणारे ब्राह्मण, बोधिसत्व, जातक आणि २८ बुध्द
सुध्दा होते. परंतु त्या सर्वांना नाकारून बाबासाहेबांनी शुध्द स्वरूपातील बौध्द
धम्म आपल्याला दिला आहे. यावर लेखकाला मी हे सांगू इच्छितो कि, वरील सर्व गोष्टीना
बाबासाहेबांनी बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये स्वीकारले. (काहीना हा ग्रंथ
करप्ट वाटतो) त्यामुळे ह्या गोष्टी अशुध्द आहेत असेही मानण्याचे काही कारण नाही.
तर ज्यांचा बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथावर विश्वास नाही त्यांनी
बाबासाहेबांच्या हयातीमध्ये प्रकाशित झालेले बौध्द पूजा पाठ हे त्यांनी लिहिलेले
पुस्तक अवश्य वाचावे, ज्यातील गाथांचे संकलन बाबासाहेबांनी श्रीलंकेत जाऊन केले
होते. त्यामध्ये सुध्दा अनेक बुद्धांचे अस्तित्व स्वीकारणाऱ्या गाथा,
अन्तरिक्षातिल जीवांचे अस्तित्व स्वीकारणाऱ्या गाथा, तसेच पूजादी विधी समाविष्ट
आहेत.
९. लेखक पुढे म्हणतात की, हीनयान आणि महायान यांनी स्वतःला
श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी बुध्दांना चमत्कारिक बनविण्याची स्पर्धाच सुरु केली,
यातूनच जातक कथांची निर्मिती करण्यात आली. हे अत्यंत चुकीचे मत आहे. या संदर्भात
अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचून घ्यावेत..
वरीलप्रमाणे
मी ज्याप्रकारे लेखकाने मांडलेल्या मुद्यांचे खंडन केले, त्याप्रमाणे लेखकाला आणि
त्यांच्या समर्थकांना धम्माचे आकलन करता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये
निर्माण झालेल्या गैरसमजुतीमुळे त्यांना असे वाटते कि, बुध्द चरित्रामध्ये किंवा
धर्मामध्ये हे संदर्भ चुकीच्या पद्धतीने घुसडविण्यात आलेले आहेत आणि त्यांचा मूळ
बौध्द धम्माशी संबंध येत नाही. त्यामुळेच लेखकाचे समर्थक बुध्द आणि त्यांचा धम्म
ह्या ग्रंथामधील बाबासाहेबांनी मांडलेल्या मतांना खोडून काढण्यासाठी त्यांच्या
जुन्या लेखन आणि भाषणातील संदर्भ देतात, जे सरळपणे कोणत्याही मुद्यांना खोडू शकत
नाहीत. याद्वारे ते केवळ हे दर्शवू इच्छितात की, बाबासाहेबांनी त्यांच्या अमुक
भाषणात असे म्हटले होते तर बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये तमुक कसे काय
म्हणू शकतील असा समर्थकांचा आशय आहे. लेखाची लांबी पाहता त्यांच्या सर्वच
प्रश्नांची उत्तरे मी थोडक्यात देतो.
लेखक चौथ्या संदर्भात म्हणतात की बाबासाहेब असे म्हणतात,
बुध्दांनी जे उपदेश केले आहेत, जो धम्म शिकविला आहे, जर तो तुमच्या तर्क व अनुभव
यांच्या पेक्षा भिन्न वाताला तर केवळ त्यांनी उपदेश केलेला आहे म्हणून तो तुम्ही
स्वीकारावा हे बंधनकारक नाही. परंतु तुम्ही तुमच्या तर्क व अनुभूतीच्या स्तरावर जो
काही धम्म जाणला त्याला modify करण्यासाठी तुम्ही मुक्त आहात.
सदर
उपदेशाचे मूळ बुध्दवाणीमध्ये कालाम सुत्तामध्ये सापडते, जिथे भगवान बुध्द
कालामांना उपदेश करतांना सांगतात -
१. हि गोष्ट वारंवार ऐकली आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
२. हि गोष्ट परंपरेने मानली जात आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
३. हि गोष्ट आमच्या धर्मग्रंथाच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
४. हि गोष्ट तर्कसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
५. हि गोष्ट न्यायसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
६. हि गोष्ट आमच्या मताच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
७. सांगणाऱ्याचे व्यक्तीत्व व त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक आहे म्हणुन त्याची
गोष्ट स्वीकारु नका.
८. सांगणारा श्रमण किंवा ब्राह्मण हा पुज्यनीय आहे म्हणुन त्याची गोष्ट
स्वीकारु नका....
तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी कुशल आहेत, निर्दोष आहेत, त्यानुसार चालण्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल, त्याचाच स्वीकार करा. जे
सत्य आपल्या अनुभवांनी जाणले गेले, आणि बघितले कि हे कुशल आहे, तेव्हा ते केवळ जाणुनच राहु नका, तर त्यानुसार आचरण करा तरच
तुमचे कल्याण होईल.
ह्या
उपदेशातील ७ आणि ८ वा बिंदू याठिकाणी बाबासाहेब अधोरेखित करीत आहेत, येथे हे
लक्षात घ्यावे. अर्थात हा सिद्धांत केवळ बुध्दांनाच नाही, तर अगदी बाबासाहेबांना
सुध्दा लागू होतो. कारण बाबासाहेबांचे विचार अत्यंत वेगाने बदलत असत. हे अनेक
पैलूंवर तपासून पाहता येते. जसे हिंदू धर्म सुधारक बाबासाहेबांनी जिथे मनुस्मृती
जाळली, तिथे गीता त्यांना मान्य होती. परंतु धर्मांतराची घोषणा केल्यावर गीता हा
मूर्खपणे लिहिण्यात आलेला ग्रंथ वाटू लागला तर बौध्द धम्माचा स्वीकार केल्यानंतर
मात्र त्यांना असे वाटू लागले की, गीतेमध्ये सुध्दा चांगल्या गोष्टी आहेत, परंतु
त्या बौध्द धम्मातूनच घेण्यात आलेल्या आहेत. बाबासाहेबांच्या ह्या गुणांमुळे
त्यांच्यावर बऱ्याच प्रमाणात टीका सुध्दा करण्यात येत असे. त्यावर बाबासाहेब
म्हणत, "विचारातील सातत्य हा गाढवाचा गुण असतो. कोणताही विचारी माणूस
आपल्या पुर्वी व्यक्त केलेल्या मताशी सातत्याच्या नावाखाली स्वतःला बांधून घेत
नसतो. सातत्यापेक्षा जवाबदारी हि महत्वाची असते. जवाबदार माणसाकडे पुनर्विचार
करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धाडस असलेच पाहिजे. अर्थात
त्यासाठी पुरेशी आणि चांगली कारणे असली पाहिजेत. विचारात शेवटचा शब्द अशी कोणतीही
गोष्ट नसते"
आता समर्थकाने मांडलेल्या पहिल्या मुद्याकडे वळू. वर
मांडलेल्या दोन विचारांच्या आधारे आपण स्वतः विचार करा, आणि आपल्या अनुभूतीच्या
आधारे स्वतः जाणा, स्वतः अनुभव करा, केवळ तर्क करून निष्कर्षाच्या पर्यंत पोहोचू
नका की, कोणत्या गोष्टी कल्याणकारक आहेत आणि कोणत्या अकल्याणकारक. आणि त्यांचा
स्वीकार करा. कारण त्यासाठी पुरेशी आणि चांगली कारणे असली पाहिजेत. विचारात शेवटचा
शब्द अशी कोणतीही गोष्ट नसते, हे सुध्दा लक्षात ठेवा. बाबासाहेबांचे हे वक्तव्य
कि, विपश्यना आणि अभिधम्म हे सध्या भारतामध्ये होऊ घातलेल्या धम्म चळवळीसाठी घातक
ठरू शकतात. हे कोणत्या वर्षाचे आहे..? आणि त्यावेळी भारतातील बौध्द समाजाची
परिस्थिती काय होती..? तेव्हा कमरेमागील लटकणारा झाडू बाहेर काढायचा की, अभिधम्म
शिकायचा..? - जो सामान्य लोकांना समजण्यास अत्यंत कठीण आणि जटिल आहे अशा
अभिधम्माकडे थेटपणे वळणे किती प्रमाणात त्यांच्यासाठी उपयोगी होणार होते. म्हणूनच
बाबासाहेब म्हणतात, This way of presenting Buddhism would
be fatal to our cause. पण आता मात्र परिस्थिती तशा प्रकाराची नाही, समाजाने बऱ्याच
प्रमाणात धम्मामध्ये प्रगती केली आहे. त्यामुळे ह्या मार्गाचा स्वीकार करण्याला
हरकत नसावी. असो हा आपल्या लेखाचा विषय नाही.
२. समर्थक म्हणतात की बाबासाहेब एका लेखामध्ये लिहितात, Buddha never arrogated to himself any such status. He was
born as a son of man and was content to remain a common man and preached his
gospel as a common man. He never claimed any supernatural origin or
supernatural powers nor did he perform miracles to prove his supernatural
powers.
वास्तवात,
बाबासाहेबांच्या सदर विचारांचा समर्थकाने जो अर्थ काढून अपप्रचार करणाऱ्या
लेखकाच्या ज्या मुद्यांना समर्थन प्रदान करून पाहण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी
याचा जराही संबंध येत नाही. लेखकाने व समर्थकाने बौध्द धम्माच्या कमी आकलानामुळे अशा
प्रकारचा अर्थ काढलेला दिसतो. बौध्द धम्माच्या सर्वच शाखा ह्याच सिद्धांतावर
विश्वास ठेवतात कि, बुध्द हे कोणत्याही प्रकारचे ईश्वराचे अवतार, त्याचे पुत्र,
किंवा दूत नाहीत. तर ते आपल्यासारखेच केवळ एक सामान्य मानव आहेत, ज्यांनी अशा
अवस्थेला प्राप्त केले आहे, जी मानवाच्या मनाच्या विकासाची सर्वोच्च अवस्था आहे
आणि आपल्यापैकी कोणीही त्या अवस्थेला पोहोचू शकतो. त्यामुळेच त्यांनी स्वतः काहीही
दैवी असल्याचा दावा केलेला नाही. भगवान बुद्धांच्या धम्माचे ध्येय आहे, निर्वाण
प्राप्त करणे. कोणत्याही प्रकारच्या ऋद्धीबळांचे प्रदर्शन करणे नाही. अर्थात
समर्थकाला वाटते कि, बाबासाहेबांनी बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये
बुद्धांना चमत्कारिक घोषित केले. (यावर त्यांचा संशय आहे, कारण जर वरील वाक्य
बाबासाहेबांचे आहे, तर तेच बाबासाहेब बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये
बुध्दांना चमत्कारिक कसे काय घोषित करतील...?) पण समर्थक त्यामागील मूळ उद्देशाला
समजू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना असे वाटले की, बुध्दांना चमत्कारिक घोषित
करण्यात आलेले आहे. आपण सर्वांनी सर्व पूर्वग्रह दूर करून सदर विषयाच्या अत्यंत
खोलामध्ये जाऊन त्याला अभ्यासले पाहिजेत. तेव्हाच तुम्हाला उमजेल की,
बाबासाहेबांनी केलेल्या दोन्ही गोष्टी कोणत्या स्तरापर्यंत योग्य आहेत आणि
एकमेकांना पूरक सुध्दा..
५. बाबासाहेब म्हणतात की, बुध्द हे भारतातील प्रथम
क्रांतिकारक पुरुष होते. याचा अर्थ असा होतो की, बोधिसत्व संकल्पना चुकीची आहे,
इत्यादी..? भगवान बुध्द हे क्रांतिकारक पुरुष होते, ज्यांनी रक्ताचा एकही थेंब न
सांडविता क्रांती केली. त्यांनी आपल्या धम्माच्या बळावर ती क्रांती केलेली होती,
हे आपण का विसरतो..?
६. अ. बाबासाहेबांच्या मतानुसार एका बुध्द अनुयायासाठी
बुद्धांच्या द्वारे उपदेश केलेल्या धम्माचा अभ्यास करण्यासाठी निकायांच्या आधारावर
अवलंबून राहणे कठीण आहे., कारण त्यांचा आवाकाच इतका आहे, की सामान्य जणांना इतके
सारे ग्रंथ वाचून सुध्दा त्यांच्यातील सार काळाने कठीण जाते. त्यामुळे
ख्रिस्तांच्या बायबल सारख्या एका ग्रंथाचे अस्तित्व असणे अत्यंत आवश्यक आहे, जो
वरील सर्वांच्या गरजा भागविण्यास सक्षम असावा. यासाठी नव्या एका ग्रंथाची निर्मिती
करणे आवश्यक होते.
ब. बाबासाहेबांनी भगवान बुद्धांच्या भिक्षु संघाची नेहमीच
प्रशंसा केलेली आहे. पण भगवान बुद्धांच्या काळामध्ये भिक्खू संघाची जी स्थिती
होती, नंतरच्या काळातील भिक्षु संघाला ती टिकविता आलेली नाही. त्यामुळे त्यांची
पुनर्रचना करणे अपरिहार्य होते. याचा अर्थ बाबासाहेबांना भगवान बुद्धांच्या
धम्मामध्ये मोठे बदल करायचे होते असा तर्क लावून त्या आधारे बौध्द मताचे व
नैतिकतेचे अविभाज्य अंग असलेल्या जातक कथांना नाकारायचे होते असा अर्थ कोणी का
लावावा..
यामध्ये बाबासाहेबांनी बुध्द आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ
लिहून वरीलपैकी प्रथम उद्द्येश जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण काही
कारणास्तव त्यांना ते ग्रंथ (कदाचित) पूर्ण करता आले नाही.
७. समर्थक असा आरोप करतांना दिसतात की, भारतीय
धाम्मापादामध्ये दैववाद असल्यामुळे बाबासाहेबांनी भारतीय धम्मपद नाकारले व
त्याऐवजी चीनी धम्मपद स्वीकारले. पण वास्तवात बाबासाहेबांच्या मतानुसार, धम्मापदाचे
भारतीय संस्करण अपेक्षेनुरूप प्रभाव पाडू शकेल नाहीत, परंतु त्याचे चीनी संस्करण
मात्र उत्तम आहे. आता समर्थकांचा हा दुटप्पीपणा बघा. एका बाजूने दैववाद आहे म्हणून
भारतीय धम्मपद बाबासाहेबांनी नाकारले असे ते म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला ज्या
महायानाने बौध्द धम्मात दैववाद शिरविला असा ते आरोप करीत आहेत, त्याच महायान
संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या धम्मपदाला ते भारतीय धम्मपदामध्ये तथाकथित
दैवावादामुळे त्याच्या विरोधासाठी वरवर समर्थन करतांना दिसत आहेत.
वास्तवात, वर दिलेले संदर्भ चुकीचे नाहीत. परंतु बौध्द
धम्माच्या योग्य प्रकारे न झालेल्या आकलना मुळे त्यातून चुकीचा अर्थ काढून त्यांचा
संदर्भ चुकीच्या जागेवर लावण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तसेच आमचे कल्याणमित्र
विशाल वज्र यांची एका पोस्टवर प्रतिक्रिया वाचली, ती ह्या विषयाशी संबंधित
असल्याने त्या प्रतिक्रियेचा या ठिकाणी उल्लेख करणे आवश्यक वाटते :
आपल्या
समाजात केवळ विरोधासाठी विरोध करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे, पदोपदी शब्दांचा किस पाडल्या जातो, बुद्ध, बाबासाहेब जे कधी बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी घालण्यात येतं व बौद्ध
सुत्रांतील संदर्भाची मात्र हेटाळणी करण्यात येते व बाबासाहेबांच्या लिखाणातील
संदर्भांना "ते तितके महत्वाचे नाही" असे म्हणून बगल दिली जाते, अशे एक ना दोन बरेच अनुभव मला देखील आले आहेत.
तसेच एक
अतिशय विचित्र प्रथा आपल्या लोकांनी सुरू केली आहे, कुणी तरी केवळ शिक्षित आहे व त्याने कुठलीतरी मोठे पद प्राप्त केले आहे अश्या
लोकांना आपण धम्मा वर बोलण्यासाठी पात्र समजतो, (त्याने धम्माचा अभ्यास केला असो अथवा नसो) त्याचे मोठे पद हीच केवळ त्याची
पात्रता. अनेकदा तर आपण त्यांना भिक्षूंपेक्षाही जास्त मोठेपणा देतो. यामुळे जे
खरोखर 'विद्वान' भिक्षु व उपासक धम्मअभ्यासक व जाणकार आहेत, ज्यांनी बौद्ध सूत्रांचा, त्रिपिटकाचा, व इतर बौद्ध शास्त्रांचा तसेच बाबासाहेबांच्या लिखाणाचा अभ्यास केला आहे
त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, का तर
त्यांच्या कडे मोठे पद नाही. हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे.
कुणी केवळ
साहित्यिक आहे, मोठा सरकारी अधिकारी, राजकीय नेता, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, वकील इत्यादी आहे म्हणून तो/ती धम्मावर
बोलण्यास पात्र होत नाही. तर ज्याने कुणी भिक्षु अथवा उपासक, त्रिपिटकाचा, सूत्रांचा, शास्त्रांचा, अभ्यास केला आहे, व तो स्वतः त्याचे पालन करतो म्हणजे धम्मधर आहे, तोच धम्मावर बोलण्याचा अधिकारी आहे, केवळ
सांसारिक जीवनातील त्याच्या नोकरीतील पदामुळे नव्हे, हे आपण समजून घेतले पाहिजे. या दृष्टिकोनाचा आपल्या समाजात प्रसार व्हायला
हवा.
- विशाल वज्र...
वर मांडलेल्या सर्व मुद्यांना योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी खाली लेख तसेच पुस्तक अवश्य वाचा :
१. भगवान बुद्धांची धम्मदेसना
![]() |
मुख्यत:बौध्द हा शब्द पाली भाषेत नाही त्यामुळे बौध्दधम्म हा चुकीचा शब्द प्रयोग आहे. बुध्द धम्म आणि संघ ही तिन रत्ने आहेत. बुध्दानी धम्म सांगितला बौध्दधम्म नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी सांगितलेला धम्म म्हणजे स्वभाव धर्म सर्व मानव जाती करिता आहे एका संपद्राया करिता नाही.
उत्तर द्याहटवाजिघच्छा परमा रोगा, संखारा परमा दुखा।
उत्तर द्याहटवाएव ञत्वा यथाभूतं निब्बानं परम सुखं॥
बुद्ध म्हणतात, की सर्व रोगांचे मूळ शेवटी जिघृक्षा आहे.
ग्रहण करण्याची इच्छा, तृष्णा. सर्व दुःखाचे मूळ आहे संस्कार. हेच जाणून घेत....__
https://bhimrath.blogspot.com/2018/08/blog-post_14.html?m=1
जिघच्छा परमा रोगा, संखारा परमा दुखा।
उत्तर द्याहटवाएव ञत्वा यथाभूतं निब्बानं परम सुखं॥
बुद्ध म्हणतात, की सर्व रोगांचे मूळ शेवटी जिघृक्षा आहे.
https://bhimrath.blogspot.com/2018/08/blog-post_14.html?m=1